स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाचे साक्षीदार होणे ही गर्वाची बाब; गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर
गजानन ढाकुलकर
नागपूर कुही :- स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत असल्यामुळे त्याचा अमृत महोत्सव साजरा करता येणं, त्याचा साक्षीदार बननं ही आपणा सर्वांसाठी गर्वाची व भाग्याची बाब आहे.असे उदगार पंचायत समिती कुहीचे गटविकास अधिकारी मनोज हिरूडकर यांनी काढले. ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पचखेडी येथील “हर घर तिरंगा” मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमात बोलत होते.
जिल्हाधिकारी नागपूर यांचे आदेशानुसार आज १ ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती चे औचित्य साधून जिल्ह्यातील ७५ शाळांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकजागृती करायचे होते. त्या अनुषंगाने आयोजिलेल्या कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रांजलताई चौधरी सरपंच पचखेडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंताराम ठाकरे, उपसरपंच दिनेश टांगले, केंद्रप्रमुख मनोज बोरकर, ग्रामपंचायत सदस्य देविदास वनदूधे, सेवक मुळे, ज्ञानेश्वर टांगले यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्याचा मागोवा, भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे व प्रगती, अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, ध्वज संहितेची माहिती, विद्यार्थ्यांना घरोघरी झेंडे लावण्यास प्रेरित करणे या विषयांवर मार्गदर्शनपर भाषणे झालीत.
गटविकास अधिकारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांना वर्गणीतून झेंडे उपलब्ध करून देण्याचे व मदतीचे आवाहन केले. आपल्या प्रास्ताविकात केंद्रप्रमुख मनोज बोरकर यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी गावात जनजागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन गोदरू दहीलकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय पेशने यांनी केले.
कार्यक्रमानंतर मा. गटविकास अधिकारी यांचे उपस्थितीत सर्वांना जनजागृतीपर दोन ध्वनिचित्रफिती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गोविंदा नन्नावरे, शिक्षकवृंद रफिक शेटे, अर्चना खैरे, माधुरी सेलोकर, गीता काळे, अलका कामडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी गावातील पालक वर्ग व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.