कर्मयोगी फाऊंडेशनने केले ७५ सैनिक परिवारांना सन्मानित
_स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित विशेष उपक्रमाचे आयोजन_
गजानन ढाकुलकर
हिंगणा :- कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर, कर्ते व्हा या तत्वावर नाविन्यपूर्ण कल्पकता राबवीत सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करत आहे. देशात सर्विकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्याच धर्तीवर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेतून कर्मयोगी फाऊंडेशनने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा २०२२ देशाचे रक्षण करतांना शहीद झालेल्या तसेच वीरमाता विरपत्नी आजी माजी ७५ सैनिक परिवारांना सन्मानित करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत प्रत्यक्ष कृतीतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी बुधवारला आई सभागृह बुटीबोरी येथे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर , उदघाटक सकाळ वृत्तपत्र विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, प्रमुख उपस्थिती नागपूर ग्रामिणचे पोलीस अधीक्षक विजय मगर, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम कुंभेजकर, आजीवन ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वरदादा रक्षक, दिव्यांग भारतीय क्रिकेट टीमचे आंतराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत, माजी विंग कमांडर प्रतीक्षा ठाकरे, जॉन्सन लिफट बुटीबोरीचे वरिष्ठ मानव संसाधन मनीष मानापुरे ही प्रमुख मंडळीं व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी अध्यक्षीय भाषणात शरद निंबाळकर म्हणाले की या देशाला कोणी सांभाळले असेल तर ते शेतकरी आणि सैनिक यांनीच सांभाळले. शेतकऱ्यांनी देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण केली तर, सैनिकांनी देशाचे रक्षण केले त्यामुळे आज सैनिकांना सन्मानित करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येथे साजरा होत आहे. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे. यापेक्षा जगात दुसरा कोणताही धर्म नाही. बाकी सर्व जातपात फालतू आहे. त्यामुळे कर्मयोगी दुसऱ्यांना प्रेम देणे व दुसऱ्याकडून प्रेम मिळवणे हे महान कार्य ते करत आहे असे ते म्हणाले. योगेश कुंभेजकर म्हणाले की कर्मयोगी सारख्या संस्था जेव्हा गाव पातळीवर काम करण्यात समोर येतात तेव्हा त्याची फार मोठी मदत आम्हाला होते. कर्मयोगीने घरोघरी मदतीचा व प्रेमाचा दीप लावण्याचे जे कार्य हाती घेतले आहे तेच कार्य आता आम्हीही करत आहोत.
यावेळी विजय मगर म्हणाले की कर्मयोगीचे कार्य इतके प्रेरणादायी व शिस्तबद्ध आहे की त्यांचे अनेक उपक्रम आता आम्ही राबवित आहोत. सैनिक हे कधीच माजी नसतात तर ते सदैव देश सेवेसाठी तत्पर असतात. त्यामूळे आजच्या या सोहळ्याला विशेष महत्व आहे. संदीप भारंबे यांनी आपले विचार मांडताना म्हटले की कर्मयोगी ही संस्था काही धन दांडग्याची नाही. आपल्या कष्टातून थोडी मिळकत काढून कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कृतिशील विचारसरणी ते प्रामाणिकपणे जोपासत आहे. यावेळी ज्ञानेश्वर दादा रक्षक म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा साजरा करावा हे महाराष्ट्र सरकारने कर्मयोगी कडून शिकून घ्यावे इतका हा प्रेरणादायी उपक्रम आहे.
हा भव्य दिव्य कार्यक्रम शिस्तबद्ध रित्या उत्स्फूर्त पुर्वक वातावरणात कृतज्ञता जपत, सन्मान सोहळा देशभक्ती गीताच्या निनांदा मध्ये स्फूर्तीदायक राष्ट्रगीत आणि राष्ट्र वंदनेच्या ताला सुरात त्रिवार जयघोष घेऊन. संपन्न झाला. तसेच सर्व आमंत्रित उपस्थितांना महाराष्ट्राची संस्कृती जपत पुरण पोळीचे भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आगमनापासून ते जेवणापर्यंतची शिस्तबद्ध पद्धती पाहून व कार्यक्रमातील सर्विकडे प्रेमाचे व आनंदाचे वातावरण पाहून अनेक सैनिक परिवार भारावून गेले व इतका अविस्मरणीय व प्रेमळ सोहळा आम्ही आमच्या जीवनात पहिल्यांदा अनुभवला व खरंच कर्मयोगी फाऊंडेशनचे कार्य हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वाप्रमाणे आहे हे अनेक मंडळीनी बोलून दाखविले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली.