राशीतल्या नौंटकीबाज ‘गुर्जी’ने मुलांना दिले मानसिक आजारपण
भंडारा: ‘राशी’तल्या गुरूजीचा अरेरावीपणा आणि गोडबोलेपणा असा दुहेरी मुकुट धारण केलेल्या दुतोंड्या सापाकडून कोणतेही शैक्षणिक मार्गदर्शन झाले नसून, फक्त देखावा निर्माण करून सरकारी शाळेत प्रवेशाच्या नावाखाली ‘माया’ जमविण्याचा गोरखधंदा मागील १३ वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे. आजवर शैक्षणिक अभ्यासक्रमाचे साधे पुस्तक उघडून न शिकवणा-या ‘या’ गुर्जीने सहाय्यक शिक्षकांच्या मदतीने फक्त स्कॉलरशीप व नवोदय यावरच भर देत विद्यार्थ्यांना मानसिक दडपणाखाली ठेवत अक्षरश: त्यांचे आनंदी बालपण हिरावून घेतल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. तर माध्यान्ह भोजनाच्या वेळी विद्यार्थी मानसिक दडपणाखाली भरल्या ताटावर रडतांना अनेकांनी पाहिले असता, मुलांना मानसिक आजारपण देणा-या ‘गुर्जी’स जाब विचारणा-या पालकांचे न ऐकून घेणा-या या दुतोंडी सापाने अरेरावीपणे बोलून पालकांना तसेच मुलांनाही आपल्या दहशतीखाली शांत केल्याची ग्रामस्थांत चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.
कुबेरालाही लाजेवेल असा गुर्जी मधाला जसे मोहोळ चिकटते, गोचिड जशी रक्त पिण्यास जनावरांना चिपकते तसेच एकाच ठिकाणी तेरा वर्ष ठिय्या मांडून गावातीलच राजकारण्यांना कवटाळून आपला स्वार्थ साध्य करणारे काही गुर्जी असतात. ‘जिथे धन, तिथे तन’ असे त्यांचे जीवनसूत्रच असते. खोऱ्याने बेनामी संपत्ती कमविण्याकरिता अशी माणसे मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना बेमुवर्तपणे राजकारण्यांसोबत कटकारस्थान रचून दूर करीत जाते. असाच एक महाभाग म्हणजे ‘शायद मुबारक हो’! तुम्ही दुकान टाका, एखादे सेवा केंद्र सुरू करा की, मग शाळा-महाविद्यालय उघडा, जर उद्देश केवळ पैसा कमावायचा असेल, तर मग इतर गोष्टी गौण ठरतात.
डोळ्यासमोर, जळी, स्थळी, काष्ठी केवळ पैसाच दिसत असेल, तर माणसाचे वर्तनही अमानवीय, समाजविरोधी होऊन जाते. राज्यातील नावलौकीक असलेल्या शाळेबाबत असेच काहीसे होऊन बसले आहे. शाळेचे शैक्षणिक सत्र सुरू झाले की, नियमात बसत असो की नसो, ‘दादारे… एच्छिक देणगी द्या की हो’, अशी आरोळी देत प्रवेशाच्या नावाखाली पैसे उकळायचेच, असा चंग कथित नौटंकीबाज गुर्जीने बांधला आहे. पहिल्या वर्गात प्रवेशासाठी आलेल्या बाहेरगावच्या पातकांकडून या गुर्जीने ऐच्छिक देणगीच्या नावाखाली चक्क सात हजार, १० हजार लाटले असल्याचे आता उघडपणे बोलल्या जात आहे. तर या जमा झालेल्या पैशाचे केले काय? असा प्रश्न विचारलेल्या पालकांच्या मुलास बेदम मारहाण केल्याचेही पालकाने सांगितले.
या महाभागाच्या कारनाम्यांनी अनेक विणीच्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे, लोकप्रतिनिधींचे राजकीय भवितव्य धोक्यात आले. अनेकांची बदनामी करणे, गैरसमज निर्माण करणे, मतभेद निर्माण करणे यात ही व्यक्ती पारंगत आहे. या व्यक्तीविषयी काही लिहावे, या कुवतीची ती नाही, परंतु त्याचे कारनामे, त्याच्यामुळे दुखावलेल्या, नुकसान झालेल्या व्यक्तींची यादी मोठी असल्याने आणि याने वाम मार्गाने कमविलेल्या संपत्तीचे अनेक किस्से सध्या भंडा-यात सर्वदूर चर्चिले जात आहेत.
आता ‘मुबारक हो’ म्हणणारे तोंड उघडायला पुढे सरसावत असून आपला गेलेला पैसा परत भेटणार काय? अशी आशा अनेक गोर गरीब पालक वर्ग लावून आहेत. अनेकांना हा अन्याय सहन न झाल्याने आपली मुले इतरत्र शाळेत दाखल केली आहे. फक्त पोपटपंची, देखावा आणि गोडबोल्या गुर्जीची फोकनाडबाजी याशिवाय काहीही नसल्याचे ‘राशी’तल्या या महाभागाबद्दल ग्रामस्थ बोलत आहेत. मागील १३ वर्षात प्रवेशाच्या नावाखाली जमवलेल्या ‘मायाजाला’त शिक्षण क्षेत्रातील कोण कोण अधिकारी वाटेकरी झालेत याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.