मिरवणुकीच्या सुंदर परंपरेची हेळसांड
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: पुण्याची विसर्जन मिरवणुक पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे. चॅनेलवर होणारं लाईव्ह प्रक्षेपण जगभर पाहिलं जातं. स्तुतिसुमनांची उधळण होत असलेल्या या मिरवणुकीला आता अलीकडे मात्र टीकेला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कर्णकर्कश्शय दर्जाहीन गाणी आणि त्यावर कार्यर्त्यांचे बेफाम नाच.
मंडळांचे रेंगाळणारे रथ आणि तासनतास चालणारे ढोलवादन. मी स्वतः ढोलवादन करतो. ढोलाची थाप तालात पडली की रोमांच उभे राहतात.. पण आता मात्र ढोलवादनावर अर्थकारणाचा रंग चढलाय. याचा खेद वाटतो. परंपरेची हेळसांड होताना बघून वाईट वाटते. पण यातून सावरून निराश न होता, पुढच्यावर्षी माझ्या मंडळाचा गणेशोत्सव चांगला कसा सादर करता येईल याचा विचार मनाला उमेद देतो. आपल्या गणेशोत्सवाला काहीतरी ग्रहण लागलं आहे, पण हे ग्रहणही दूर करता येईल.
जर शासन, प्रशासन, मिडिया आणि राजकारणी यांनी एकत्र येवून चांगला विचार केला आणि आम्हा युवकांना विश्वासात घेतले तर पुण्याची गणेशोत्सव परंपरा पुन्हा वैभवसंपन्न होईल. पुणे हे संस्कृतिचे माहेरघर आहे. आम्ही ही संस्कृती जपायला हवी. तरच लोकांना मिरवणूक त्रासदायक न वाटता आकर्षक वाटेल.