मनसेचा ‘एकला चलो रे’ चा नारा
मुंबई- मनसे आणि भाजपाची वाढती जवळीक पाहता आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये युतीचे वारे वाहू लागले होते. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा होत असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.
पण या सर्व चर्चांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी मनसेने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. इंजिनास डबे जोडणी बंद झाली आहे. मुंबईत मनसे सर्व जागांवर म्हणजेच २२७ जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मुंबईसोबतच इतरही सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
“राज ठाकरेंचे आदेश आम्हाला मिळाले असून पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे सर्व २२७ जागांवर उमेदवार देईल”, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.