नवपालवी…… साहित्यगंध ‘दिपोत्सव’ प्रकाशनाची
स्वप्नात जगले मी
वास्तवता ठेवून
कृपार्थी आपण
सन्मानिले मज अध्यक्षता देऊन
खरं म्हणजे सुरूवात कोठून करावी हेच न समजल्यामुळे मनोगतास विलंब….! अनोखा सोहळा मराठीचे शिलेदारांचा, त्यात मला मानाचे राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्ष पद भुषवण्याची संधी मिळाली याहूनी भाग्य ते काय थोर. संग्रामदादा मुळे मला मंचावर व्यक्त होण्याची संधी मिळाली.
उतराई कसे होऊ
राहुल दादा, संग्राम दादांची
धुरा सांभाळण्यास दिली
काव्य संमेलनाध्यक्ष पदाची
खरं म्हणजे नवकविंना जसे मंच तसेच नवाध्यक्षांना सुद्धा इतके मोठे मंच मिळाले….! “आपण प्रथमच भेटतो आहोत, असे वाटलेच नाही.” सविता ताईंच्या या वाक्याने जणू माझ्याच ह्रदयाचा ठाव घेतला.
होते ऋणानुबंध म्हणून
भेटलो एकमेकांस
मी नफ्यात
सविता ताई मैत्रीण भेटली खास
वैशाली ताईंनी त्यांच्या गोड शब्दांनी माझ्या मनाचा….वेध घेतला कायमचा… जेव्हा त्या म्हणाल्या किती छान बोलली, दिसते पण किती गोड… आईचा जिव्हाळाच जणू शब्दातून पाझरला… ज्येष्ठ कवी कोम्पलवार दादांच्या वर्णनाचे वर्णन करणे मला अशक्य.”गोदामाईचे पवित्र पाणी” ही त्यांनी दिलेली उपमा.. सर्वोच्च पुरस्कार माझ्यासाठी. सगळ्यात जास्त टाळ्या तुझ्यासाठी वाजवल्या म्हटल्यास आकाशच ठेंगणे झाले मजसाठी.
संग्राम दादा म्हणाले “बीडचा कोहिनूर हिरा” सापडला आणि बोलण्यातील विश्वास द्विगुणित झाला. त्यांच्या निवडीस मी पात्र ठरले या त्यांच्या आनंदापेक्षा मी जास्त आनंदी. राहुल दादांना पाहताक्षणीच त्यांच्या कडक शिस्तीमध्ये लपलेला प्रेमळ स्वभाव जाणवला आणि भीती दूर होऊन आत्मियतेने जागा घेतली. माणसं जवळ आल्याशिवाय कळत नाहीत, हेच खरे….!!
पुष्पाताई, तारकाताई, कविता ताई, मोहिते दादा,विलास दादा (काही दादा _ ताईंचे नावं माहीत नाहीत ही खंत आणि क्षमस्व… सर्वांची कृतार्थी) अशा किती शिलेदारांची नावे घेऊ ज्यांची कौतुकाची थाप मला मिळाली.
कोमेजलेल्या ह्रदयास
आपल्या प्रेमाचे फवारे
मरगळलेल्या मनास
नवपालवीचे धुमारे
अशी नवपालवीच जणू मला फुटली आहे. याची जाणीव मला झाली. सर्व शिलेदारांच्या कविता, सन्मान, एकमेकांस आदरयुक्त वागणूक, प्रेमळ संवाद….. आयुष्य भराची शिदोरी मिळाली. संग्राम दादा व त्यांच्या टीमचे नियोजन म्हणजे अवर्णनीय… इच्छा शक्ती असेल तर कुठेही उणिव न ठेवता कार्यसिद्धी होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण. त्यात नियोजनात नसताना माझ्या कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्तीचा सत्कार मराठीचे शिलेदार संस्थेने केला, त्याबद्दल कायम ऋणी. फुटलेली नवपालवी….( सर्वच शिलेदारांना ) आनंददायी,जीवनाची नव उर्जा,नव प्रेरणा.
परिवार सजला होता
मराठीचे शिलेदारांचा
काव्य प्रवास रंगला होता
सर्व ताई दादांचा
भारावला मराठवाडा
भारावली लातूरची माती
जपून ठेवूया आठवणी
अन् प्रेमाची नाती.
राज्यस्तरीय कवी संमेलनाध्यक्षा
शर्मिला देशमुख – घुमरे, बीड