“अमावस्येच्या रात्रीची भयभीत वाट”; तारका रूखमोडे (हायकू काव्यपरीक्षण)
अमावस्येची
भयावह ही रात्र
दाटे गुढत्व
पश्चिमेच्या बाहूपाशात रवी हळूहळू विलीन झाला, की कातरवेळीच्या दशदिशांवर अंधाराचं पसरतं गूढ कातळं.नि मनाला धस्स… चर्र… करणारा पसरतो जीवघेणा भयाण काळोख..,भयावह निरव शांतता, त्यात अचानक निष्पर्ण वृक्षाच्या पानांचं सळसळणं, जंगली श्वापदांचे भयावह आवाज,अचानक अभिशापित सावल्यांचं पुढ्यात येणं.. बिन ओळखीच्या वातावरणामध्ये उमटणारी अकल्पित भयाची वलये.. खरंच मनाला गारठून टाकणारी..गर्द काळोखात वळचणीला झालेली अचानक हालचाल..भेसूर अक्राळ स्पर्शाची जाणीव झाली की मनातील नास्तिकता नकळत मागे हटते व भेदरलेल्या सुरात आस्तिकतेच्या तारा भराभरा झंकारू लागतात… इतकी जबरदस्त शक्ती या अमावस्येच्या भयाण अस्तित्वाच्या तळघरात दडलेली …!
ऐकिवात की ..या अमावस्येच्या रात्री अनेक अदृश्य शक्ती उजागर होतात. अतृप्त आत्मे तृप्तीसाठी सक्रीय होऊन उच्छाद मांडत असतात, मानवी इष्टांच्या प्राप्तीसाठी नि अनिष्टांचे निवारण करण्याच्या उद्देशाने साधना आराधनेचे तंत्र साधून विद्याप्राप्तीसाठी, अलौकिक शक्तीला आवाहन देण्यासाठी अघोरी, तांत्रिक,मायावेत्ते अमावस्येला निघत असतात. ऋग्वेद, अथर्ववेद व गरुड पुराणातही याचा उल्लेख आलेला..मनुष्याने स्वतःच्या धर्माच्या कुप्या करून घेताना ईश्वर ,सुष्ट-दुष्ट शक्ती, आत्मे -परमात्मे, पाप-पुण्य यांच्या आपल्या भोवती त्यांच्यापुरत्या चकाऱ्या निर्माण केल्या. काही अनुकूल काही प्रतिकूल अशा.. निर्मिकाला छेद देणाऱ्या शक्ती सातत्याने जवळपास वावरत असल्याने आभासी जग लोकमान्य झाले..त्यातलाच एक स्तर म्हणजे पिशाच्चं दुनिया. आजही विश्वात अतृप्त आत्म्यांच्या घातक ऊर्जा उत्सर्जनाने अघोरी साधकांद्वारे तंत्रविद्येने त्यांना जागृत करून स्वस्वार्थ हेतू साध्य करून घेतात.
पण आजच्या भौतिक युगात श्रद्धा अंधश्रद्धेला छेद देऊन वास्तवाकडे वैज्ञानिकतेकडे नव्या पिढीचा कल झुकलेला.आजची पीढी या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानते.विचारमंथन होणे गरजेचे..मी या सर्वांच्या पलीकडे जाऊन म्हणेन ‘जीव हा आत्मरुपी बिंबाचे प्रतिबिंब’.. आत्मा अमर आहे ..प्रतिबिंबाला बिंबामध्ये आणि बिंबाला परमबिंबामध्ये समरस होऊन जगण्यासाठी जीवाला ‘मी’ ची ओळख होणे गरजेचे.. कारण आजच्या पेक्षाही उद्याच्या काळवाटा भयावह असणार आहेत ,म्हणून विवेकबुद्धीने भौतिक आसक्ती कमी करून यातनादायक प्रवासाच्या अमावस्यारुपी पेटीतून सुटका करून विरक्तीच्या अटकेपार नेणाऱ्या बोटीत बसून सहज सुलभ किनारा गाठावा..!
जगण्याला वेढून असणाऱ्या अंधाराची नीट ओळख झाली की उजेडाकडे जाण्याचा मार्ग आपसूकच गवसतो…म्हणूनच आध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनाला मानसशास्त्रीय वळण देण्यासाठी, प्रतिकांच्या वापरातून व दृश्य प्रतिमांच्या कवींच्या गडद भावनांना वर आणण्यासाठी या प्रतीकात्मक चित्रात अमावस्येच्या माळरानावरही तलम पोताची हायकू कविता करण्याची उर्मी निर्माण व्हावी, म्हणून कदाचित आ.राहुल सरांनी हे ‘व्हिज्युअल’ पण ‘अनव्हिज्युअल’ सेन्सचं चित्र आव्हानरुपात दिलेलं.. मलाही त्यावर गहन विचार करावा लागला. वंदन त्यांच्या या सेन्सला 🙏😊
यावर खरे उतरण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिभावंतांनी केलाय . असेच व्यक्त होत राहा. आपण कुशल आहातच..आशय नि कलाटणीकडे थोडं लक्ष द्या . अभिनंदनीय शुभेच्छा सर्वांना💐 मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल राहुल सरांचे हृदयस्त ॠणानुभार…!
प्रा.तारका रुखमोडे
अर्जुनी जि गोंदिया
परीक्षक, मराठीचे शिलेदार समूह