जि.प.खातखेडा शाळेत बिरसामुंडा यांना अभिवादन
भिवापूर: जि.प.प्रा.शाळा खातखेडा केंद्र-महालगाव पं.स.भिवापुर जि.नागपूर येथे क्रांतीकारी, धरतीआबा, बिरसा सुगना मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित आयु.अनिल मसराम, आयु.बाळकृष्णा लोनबले, सुधीर मसराम, रुपेश मसराम, सौ.सुनिता मसराम, सौ.मंदा मसराम (शा.व्य.स.स.)यांनी फोटोला पुष्पवाहुन विनम्रतापुर्वक अभिवादन केले.
सौ.संध्या शेगोकर (मु.अ) यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची माहिती सांगितली,तसेच आयु.राजु नवनागे (स.अ) यांनी मार्गदर्शनपर माहिती दिली.बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी जन्मगाव उलिहातु रांची झारखंड येथे झाला. त्यांचे पुर्ण नाव- बिरसा सुगाना मुंडा होते,आईचे नाव-करमी होते.बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती गरीबीची होती.गावात शाळा नसल्याकारणाने मामाकडे शिक्षणास पाठवले.तेथे मिशनरी शाळेत प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन संगीत, नुत्यात विशेष रस होता.
तो काळ पारतंत्र्याचा होता.संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतुन वाचले नव्हते. इंग्रजांनी वनकायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपारिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रज विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता.
सन १८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. उपासमार, रोगराईत अनेक लोकं मरण पावली. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जन आंदोलने केली. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने१८९५ ला बिरसा मुंडांना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले.याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला.तसेच आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. “उलगुलान ” म्हणजेच एकाचवेळी सर्वांगीण उठाव होय.
१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झालेत.आपल्या २५ वर्षोच्या आयुष्यात बिरसामुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मुळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले.त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले.ब्रिटीश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले.
बिरसामुंडांना चक्रधरपुर येथे बंदी बनवुन रांची झारखंड येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.त्यामुळेच ९ जुन १९०० रोजी तुरुंगात वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अजरामर झाले. या क्रांतीविराने आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी मोठा लढा दिला.त्यामुळे लोकांनी त्यांना “जननायक ” हा किताब बहाल केला.
जयसेवा… जय जोहार…. जय उलगुलान….. या कार्यक्रमाला शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी,गावातील उपस्थितांनी विनम्रपणे अभिवादन करुन,उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.