निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे, “फुले आणि परीराणी’ – शुभांगी दामले
अमृता खाकुर्डीकर, पुणे (प्रतिनिधी)
पुणे: बालसाहित्याला पोषक अशी सहजसोपी लेखनशैली, निवेदनातली चित्रमयता आणि मुलांना निर्सगाच्या जवळ घेऊन जाण्याचे सामर्थ्य असे ” फुले आणि परीराणी’ हे पुस्तक असून या पुस्तकाच्या लेखिका कवयित्री संजीवनी बोकील या शिक्षिका असल्यामुळे मुलांच्या भावविश्वाचे उत्तम भान त्यांना आहे. ” असे मत प्रसिध्द अभिनेत्री आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले यांनी “फुले आणि परीराणी’ या बाल कथा संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा, रेखा पळशीकर आणि दिलीपराज प्रकाशनाचे संचालक मधुर बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बालदिनाचा मुहूर्त साधून “हुजूरपागा” या पुण्यातल्या नामवंत शाळेत या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लेखिका, कवयित्री संजीवनी बोकील व प्रमुख पाहुण्या शुभांगी दामले दोघीही हुजूरपागा शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्याने संस्थेने विशेषत्वाने या कार्यक्रमाचे आयोजन शाळेत केले.
या शाळेत सातवी ईयत्तेत असताना कवयित्री संजीवनी यांनी पहिली कथा लिहिली होती. ती स्मृती जागवण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून संजीवनी बोकील यांच्या या चोविसाव्या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा हुजूरपागा शाळेत साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी अन्य निमंत्रितांबरोबर खास निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या.
संजीवनी बोकील यांचे “फुले आणि परीराणी” हे पुस्तक दिलीपराज प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केले असून लहान मुलांना गंमतीदार वाटेल अशा पद्धतीने करताना एक सुंदरशी परीराणी पेटी घेऊन रंगमंचावर आवतरली,तिने जादूची कांडी फिरवली आणि पेटीतून प्रकट झाले ‘ फुले आणि परीराणी’ पुस्तक. उपस्थातांनी या अभिनव प्रयोगाला टाळ्यांच्या गजराने दाद दिली.
या प्रसंगी बोलताना शुभांगी दामले यांनी आपल्या जडणघडणीत हुजूरपागा शाळेचे योगदान अधोरेखित केले. संजीवनी बोकील यांच्या कथा संग्रहातील कथांबद्दल गौरवोद्गार काढताना त्या म्हणाल्या की, “संजीवनी यांच्या लेखनातील शब्दचित्रशैली मोहक असून त्यादृष्टीने त्यांनी आता मुलांसाठी नाटुकले लिहावे, मी ते स्वतः दिग्दर्शित करून मंचावर सादर करीन”.
श्रीमती बोकील यावेळी शालेय मुलींशी संवाद करताना म्हणाल्या, ” खूप वाचन करा; म्हणजे लिहावंसं वाटू लागेल. लिहिणं म्हणजे नवी सृष्टी निर्माण करण्याची सिद्धी लाभणं,स्वतः विश्वकर्मा बनण्याचा आनंद घेता येणं..साहित्यामुळे कल्पना
शक्ती विकसित होते, नव्या जाणिवा जाग्या होतात आणि जीवनाकडे बघायची एक नजर तयार होते”
अध्यक्षा रेखा पळशीकर आणि श्री.मधुर बर्वे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. ‘ फुले आणि परीराणी’ या पुस्तकातील कथाकथनाची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील तीन विजयी स्पर्धकांना संजीवनी बोकील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. संस्थेचे सचिव श्री. कट्टी, संस्थेच्या पदाधिकारी- प्रा.सुप्रिया अत्रे, प्रा. वॆजयंती चिपळोणकर, प्रा.प्राजक्ता वैद्य आणि शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होता. पर्यवेक्षिका श्रीमती फलटणे यांनी आभार मानले.