शालेय परिपाठात संविधानाच्या कलमाचे वाचन व्हावे; कास्ट्राईब शिक्षक संघटनेची मागणी
_शासनाकडे पत्र व्यवहार करणार; परशराम गोंडाणे, राज्य उपाध्यक्ष_
नागपूर: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये दैनिक परिपाठ हा संस्काराभिमुख उपक्रम नित्यनेमाने राबविला जातो. शालेय दैनिक परिपाठात संविधानाच्या प्रास्ताविकाचे दररोज वाचन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संविधानाच्या किमान दोन कलमाचेही दररोज वाचन करण्यात यावे. ज्यामुळे भारताच्या संविधानात काय आहे? भारतीय संविधान निर्मात्यांनी कशासाठी आपल्या देशाचे संविधान लिहिले अशा प्रकारची बरीच माहिती शालेय परिपाठात विद्यार्थ्याना बालपणापासूनच समजेल, त्यासाठी शालेय दैनिक परिपाठात दररोज किमान दोन कलमाचे वाचन घेण्यात यावे अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष परशराम गोंडाणे यांनी शासनाकडे केली असून त्याबाबतचा पत्रव्यवहार करणार आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये दैनिक परीपाठात संविधानाच्या प्रास्ताविकाचे राष्ट्रगीत व प्रतिज्ञेसोबतच वाचन करण्यात येते. मात्र आपल्या देशाची शासन व्यवस्था संविधानात अंतर्भूत कलमांच्या दिशा निर्देशानुसार चालते. ती कलमे किती आहेत. त्या कलमांमध्ये काय लिहिले आहे याची माहिती बालवयापासूनच व्हावी. त्यासाठी शालेय परिपाठातून दररोज किमान दोन कलमाचे वाचन व्हावे अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संटनेतर्फे करण्यात येत आहे.
शाळेत दररोज अर्ध्या तासाचा परिपाठ होतो. त्यात, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान प्रस्ताविका, प्रार्थना, सुविचार कथाकथन, पसायदान यांचा समावेश आहे. या सोबतच दररोज दोन कलमाचे वाचन करण्यात यावे. भारतीय संविधानात एकूण ३९५ कलमे आहेत. दररोज दोन कलमाचे वाचन झाल्यास वर्षभरात संपूर्ण संविधानाचे वाचन होईल. तसेच विद्यार्थ्यामध्ये संविधान साक्षरण येईल. सध्या स्पर्धेचे युग असल्याने राज्यात व देशपातळीवरील सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये संविधानावर हमखास प्रश्न विचारले जातात. जर बालपणापासूनच विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती झाली; तर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा भविष्यात नक्कीच फायदा होईल.