“अजून काहीतरी सांगायचंय मला…!” संग्राम कुमठेकर
टवकारलेत ना कानं? विस्फारले ना डोळे? मनाला पडलंय ना कोडं? आता बातमी काय सांगणार बरं गोड…नसणार ना तीला तोड…मोडणार ना मी खोड…सांगितलं मला करून मोडतोड … करेल ना वाटलं मी तोडफोड…पण आजच करतो भांडाफोड…!! अजून किती ताणणार बाबा…सांग ना एकदाचं…काय तुझ्या मनात…येऊ दे जनात…अशीच अवस्था झालीय ना तुमची…माझीही अशीच काहीशी झाली होती पण संयम ठेवायचा. कुठेही गडबड करायची नाही …पटकन बोलून टाकायचे नाही …असं मी मनात ठरवलेलं…त्यामुळेचं तर यशस्वीपणे संपन्न झाला “साहित्यगंध दीपोत्सव प्रकाशन,पुरस्कार वितरण व कवीसंमेलन सोहळा”
आता सांगतोच…त्याच असं झालं…राहुलदादांनी फोन केला…सांगितलं की दिवाळी विशेषांक प्रकाशनाचा सोहळा लातूरला घेऊ या…मी येतोय…स्थळ निश्चित करू या…नियोजन करू या..,.दादा आले…स्थळ पाहिलं…स्थळ निश्चित झालं…प्रेस नोट दिली…परवानगी पत्र दिले…पेपरात बातमी प्रसिद्ध झाली. सर्व समूहात …फेसबुक…सर्वत्र बातमी झळकली नि अचानक एके दिवशी एक फोन आला…हॕलो संग्रामदादा…मी म्हटलं बोला दादा…कार्यक्रम लातूरला निश्चित केलाय…पण तुमचे सरसेनापती राहुलदादा तर येणारच नाहीत…मी म्हटलं ,”तुम्हाला कोणी सांगितलं हे” ते म्हणाले “दादांचा मला फोन आला होता.” मी म्हणालो,”ठिक आहे,दादा जर येणार नसतील तर हा कार्यक्रमच रद्द करतो.पुन्हा ते जरा चपापले नि म्हणाले ,”खरंच येणार नाहीत ,त्यांच्या कानाचं आॕपरेशन आहे, ते तुम्हाला सर्व तयारी करून देतील पण ते येणार नाहीत.आणि हो दादा…हे मी तुम्हाला सांगितलंय असं राहुलदादांना अजिबात म्हणू नका.
मी बेचैन झालो.दादांशी तर सतत संपर्क चालूच होता पण मी काही दादांना विचारलंच नाही ,तुम्ही येणार नाहीत का ? म्हणून उलट मला फोन आल्याचं सांगितलंही नाही.असेच काही दिवस गेले.राहुलदादांनी पण बाॕंम्ब टाकून पाहिला…नागपूरहून कुणीही येणार नाही …मी एकटाच येईन…तीस चाळीस लोकं येतील तरीही कार्यक्रम जोरात घेऊ आपण…मी म्हणालो दादा…लोकं दोनशे ते अडीचशे येतील…मी करतो संपर्क सर्वांशी …दादा म्हणाले बघा प्रयत्न करून कोणी येणार नाही…तरीही शांतच…संग्रामची दादांनी घेतलेली परीक्षाच जणू…मी उत्तीर्ण यात …त्यानंतर बघा हे…इतक्या लवकर प्रमुख अतिथींना निमंत्रण पत्रिका दिली तर ते विसरून जातील म्हणून काही आयोजकांचे टाळाटाळ करणे सुरू झाले नि इकडून दादांचा सारखा फोन की अतिथी फिक्स करा लवकर …वेळ कमी आहे…कार्यक्रम पत्रिका छापायची,.,बॕनर बनवायचे…शेवटी टाळाटाळ करणाऱ्या आयोजकांना सोबत न घेता दिवाळी सुट्टी लागल्या की दुसऱ्याच दिवशी प्रा.शंकर वाघमारे व प्रा.सुरेश जोंधळे सरांना सोबत घेऊन एकाच दिवशी उद्घाटक,प्रमुख अतिथी,प्रमुख मार्गदर्शक, कवीसंमेलनाध्यक्षा इत्यादी मान्यवर यांना निमंत्रण पत्र देऊन कार्यक्रमाला येण्याचे निश्चित करून त्यांचे फोटोही घेतले नि बॕनरसाठी दादांना पाठवू दिले.पण सर्व सोपस्कार पार पडल्याचा माझा हा आनंद क्षणभरच टिकला.
संध्याकाळी अचानक एक फोन आला…हॕलो संग्राम सर…राहुल पाटील लातूरला आले होते. तुम्ही फोटोत दिसत नाहीत…तुम्ही कार्यक्रम सोडून दिला की त्यांनी तुम्हाला बाजूला सारलंय…माझी तर सटकलीच…पण दादांनी स्पष्ट सांगितलेलं…संग्राम सर…तुम्हाला फोन येतील…तुमचे गैरसमज केले जातील…तुम्ही रागात यावं म्हणून काहीतरी सांगतील…बोलतील…पण तुम्ही शांत रहा…कोणताच ताण घेऊ नका…हे शब्द आठवले नि मीच हसलो…आपल्या संयमाची हीच तर खरी परीक्षा होत आहे असं समजून…पण त्यात तथ्य होतं कारण मीच दादांना विचारलं होतं की दादा,खूप अडचणी येत आहेत…पैसाही जास्त लागणारआहे…आपल्याला आता स्थळ बदलता येईल का ? दादा म्हणाले अजिबात नाही…तुम्ही डोक्यातून हे काढून टाका…फक्त सर्व नियोजन करा…बाकीचं मी बघतो नि झालंही तसंच…अशा कितीतरी घडामोडी घडून गेल्या..,परंतु मी कुठंही अडून …बसलो नाही… प्रसंगी एवढं मनात पक्क केलं होतं की…अरे संग्राम…तुझ्या नावातच संग्राम हाय…तुला कोणतंही यश सहज मिळणार नाही…तुला संघर्ष करावा लागणार हाय…हिंमतीने संघर्ष कर…यश निश्चित तुझ्याच पदरी पडणार आहे…सर्व नकारात्मक विचारांना मूठमाती देऊन फक्त कार्यक्रम यशस्वी कसा होईल याचाच सकारात्मक विचार केला…नि त्याचं फलित म्हणजे अविस्मरणीय असा लातूरचा सोहळा होय.
परवा “वैरी प्रतिमा” ही माझी रचना सर्वोत्कृष्ट १० मध्ये १ ल्या स्थानी होती…परंतु माझ्या या प्रतिमेचा मला किती त्रास होतो हे मीच जाणतो कारण या संग्रामदादाचा “शोध सत्याचा” प्रसिद्ध झाल्यापासून माझी प्रतिमा सत्यशोधकी बनली नि लोक माझ्यापेक्षा माझ्या याच शोधक नजरेपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत की काय असंच मला वाटू लागलं नि याच वैरी प्रतिमेमुळं खूपदा नयनी अश्रूही आले…माझ्या याच “अश्रूच्या वेदना” संवेदनशील मनाचे राहुलदादा व परीक्षकांनी अचूक जाणल्या नि पुन्हा सर्वोत्कृष्ट निवडलेल्या चित्र चारोळीमध्ये प्रथम स्थान देऊन सन्मानित केलं त्याबद्दल आभार न मानता ऋणात राहून माय मराठी सक्षमीकरणाच्या या महान कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा मी शब्द देतो नि थांबतो….अजूनही काही सांगण्यासाठी पुढच्या खेपेला..!!
✍️ श्री.संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©️मराठीचे शिलेदार समूह