*🚩 आम्ही साहित्यवारीचे प्रवासी 🚩*
*🚗 संग्राम दादांना फोन करून स्थळ पाहण्यासाठी गाडीची सोय होईल काय असे बोलल्यानंतर लगेच बहिणींची इच्छा पूर्ण करण्यासाठी दादांनी जवळचे नातलग राहुल थेडे दादांना पाठवले. राहुल दादांच्या मार्गदर्शनाखाली आधी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग पाहण्यासाठी रवाना झालो. परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक जागृत ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. हे मंदिर देवगीरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणांधिप हेमाद्री यांनी बांधले आहे. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हटले जाते. चिरेबंदी प्रवेशद्वारामुळे हे मंदिर भव्य दिव्य दिसते. येथील नक्षीकाम खरंच डोळ्यांचे पारणे फिटण्या लायकच आहे. आतील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊन बाहेर पडतांना मंदिराच्या परिसरात वासुदेवाचे दर्शन झाले. हल्ली रामप्रहरी वासुदेवाचे दर्शन हे दुर्मिळ झाले आहे. हे सर्व दृष्य डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघालो…*
*🌸अंबादेवीच्या दर्शनासाठी अंबाजोगाईला आलो. अंबाजोगाई हे शहर जयवंती नदीच्या काठी वसलेले आहे. तेथील अंबादेवी म्हणजेच योगेश्वरी देवी ही कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी आहे, तसेच देवस्थापैकी जागृत देवस्थान म्हणून सदा भाविकांची गर्दी गर्दी असते. मंदिरातील प्रवेशद्वार, दिपस्तंभ पाहण्यालायकच होता…पुरातन काळातील शिल्पकला ही खरंच आकर्षक टिकावू आणि मजबूत याचे ते उदाहरण…जमाना बदलला आहे नवनवीन संशोधनामुळे हस्तकलेमधे बरीच सुधारणा झाली आहे; तरी पण पुरातन शिल्पकला ही हल्लीच्या कलेपेक्षा सरसच वाटते.*
*🙏देवी योगेश्वरी ही साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप होय. दांतसूर नावाच्या एका राक्षसाने सळो कि पळो करून सोडले होते म्हणत त्यांचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप धारण करून त्याचा वध केला आणि एका आंब्याच्या झाडाखाली विसावली अशी आख्यायिका आहे. म्हणून या आधी या जागेस जोगाई आंबे म्हणून ओळखले जात होते. कालांतराने आंबेजोगाई असे नाव देण्यात आले.*
*🚩अंबाबाईचे दर्शन घेऊन मराठी भाषेतील आद्यकवी श्री. मुकुंदराज स्वामी यांच्या समाधी स्थळांना भेट दिली. अंबाजोगाईच्या पश्चिमेस जयवंती नदीच्या काठी असलेल्या खोल दरीच्या थोडासा सपाट भागातील काड्यामधील गुहेत हे समाधी स्थळ आहे. समाधी स्थळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या दरीच्या बाजूने चिरेबंदी कड्या… हळूच कानात साद देणारा खळखळणारा झरा… घनदाट वेळूचे वन, इतर झाडे भोवतालचे परिसर कसे हिरवाईने नटलेले होते. रमणीय परिसर पाहून तहानभूकच विसरली…. मन टवटवीत आणि प्रफुल्लित झाले. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू, तसेच परमामृत हे त्यांचे दोन ग्रंथ…विवेकसिंधू हा त्यांचा पहिला ग्रंथ …हा ग्रंथ ओवी छंदात रचला आहे. अंबाजोगाईचे वर्णन करताना ते म्हणतात…*
*बाणगंगेच्या तीरी l मनोहर आंबानगरी l तेथे प्रकटले हरी l जगदीश्वर l*
तसेच मराठी गौरवाविषयी बोलतांना म्हणतात…
*देशी हो म-हाटी l परि उपनिषदांचीच रहाटी l तरी हा अर्थु जीवाचिया गाठी l का न बांधावा l*
*🔹म्हणून मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईला झाला असे म्हटले जाते हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते .*
*💫 वेळेचे थोडे भान ठेवून आम्ही परत लातूर येथील औसाचा किल्ला बघण्यास रवाना झालो…भूकेची तर वेळ निघून गेली होती. कारण हे सर्व स्थळ पाहून पोट भरल्यासारखे वाटत होते. दिवसभराचा प्रवास थोडी शरिराला विश्रांती म्हणून औसाला भेट घेण्या अगोदरच औसा येथील एका रस्त्याच्या बाजुला असणा-या एका टपरीकडे गेलो… तेथे गेल्यानंतर काय नाश्ताच काय घ्यायचा म्हणून मी तारकाताईला विचारले. ताई बोलली की नाश्ता वैगरे काही ज्युस पिऊ म्हणून मी त्या हाँटेलमधल्या दादांना ज्युसमधे कोणते कोणते आहे ते सांगा तर त्यांनी लगेच सुरू केले…डोसा, वडा, भजे, उथपा वगैरे…त्यांच्या जवळ जे उपलब्ध होते त्यांची सर्व नावे सांगू लागला…एक विनोदाचा भाग सुरू झाला आम्ही सर्वजणी हसायला लागलो. पण त्याला काही कळतच नव्हते आम्ही कशासाठी हसतो म्हणून…जेव्हा थेडे दादांनी त्यांना सांगितले कि ज्युस मागितले होते तेव्हा तो पण हसू लागला… खरंच खुपच फरक आपल्या आणि तिथल्या भाषेत…आपल्या भाषापेक्षा तिथल्या भाषेत लवचिकता, मृदूता आणि गोडवा आहे…असाच एक प्रसंग सांगते. तुळजापूरहून लातूर येतांनाचा…ज्या गाडी मधे आम्ही बसलो त्याच गाडीमधे दुस-या गाडीचे प्रवासी बसले म्हणून गाडीवाल्याचे भांडणं झाली. अशी भांडण आपल्याकडे झाली असती तर खंडाजंगीच झाली असती… एवढा फरक या भाषेचा…*
*🚶♀️औसाचा किल्ला बघण्याची लयी हौस होती…चला बरं माझ्याबरोबर औसाचा किल्ला बघायला…हा किल्ला जवळपास २४ एकरात बांधलेला आहे. औसाचा भुईकोट किल्ला महमूद गवान यांचा वजीर बहामनीच्या काळात बांधला केला. किल्ल्याच्या पायथ्याशी छोटीशी वस्ती आहे. वस्ती पार करूनच आपल्याला किल्ल्याच्या बुलंद प्रवेशद्वारापाशी पोहचलो. किल्याच्या एकामागोमाग एक अशी दरवाजांची साखळी तसेच खंदकातून तटाला फेरी मारल्यास बुरूजावर शरभशिल्प, वाघ्रशिल्प, हत्तीशिल्प, कमळेचे नक्षी मन वेधून घेणारे आहेत. खंदकात अनेक विहरी आहेत. किल्याच्या चारही बाजूने खंदक आहेत. त्यातील लोहबंद बुलंद दरवाजा… राणीमहल, लालमहल,पाणीमहल खडापहारा देण्या-या सैनिकासाठी लपून बसण्यासाठी देवड्या आणि देवडीत मोठ्या प्रमाणात लहानमोठ्या तोफगोळे ठेवलेले आहेत….गडावर चढण्यासाठी छोट्या छोट्या पाय-या आणि भोवताल चिरेबंदी तट आहेत. जवळच झाडाची घनदाट झाडी आणि त्यातील थडगे तसेच खंदकाच्या बाजुला असलेला तलाव…. गडावरील लहान , मोठ्या तोफा ह्या इतिहासाची साक्ष देतात. तटाला फेरी मारता मारता गडावर झेंडा फडकवतात तेथे चढले असतात आणि आजुबाजुचे परिसर बघितले असता जणू स्वर्गसुख अनुभवल्यासारखे वाटत होते. पुरातन काळातील शिल्पकला किती मजबूत आणि टिकाऊ आहे याची प्रचिती येते. पुरातन काळापासून असल्याने काही ठिकाणी मोडकीस आलेल्या भागास डागडुजी करतांना दिसत होती.दगडांनी बांधलेला हा किल्ला डौलाने उभा आहे.*
*🍁औसा बघून झाल्यावर नंतर बालाजी मंदिर, गंजगोलाई ही तर लातूरची बाजारपेठ म्हणजेच व्यापाराचे मुख्य ठिकाण होय.या गोलाईच्या भोवताल दुकाने सजली आहेत. गंजगोलाईच्या मधोमध अंबाबाईचे मंदिर आहे या गोलाईला चौफेर असे १६ रस्ते जोडले गेले आहेत. दरवर्षी येथे नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहने साजरा होते. आणखी काही स्थळ बघायची होती. परंतु वेळे अभावी आम्ही ती बघू शकलो नाही आणि शेवटचे स्थळ ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिर हे लातूर शहराचे एक जागृत देवस्थान म्हणून गणल्या जाते मोठ्या श्रद्धेने भावी भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येते येतात. मंदिराच्या गाभाऱ्यांचे दर्शन घेतल्यानंतर बाहेर असलेला नंदीच्या कानात आपली मनोकामना बोलून दाखवायची असते. चला आपणही बोलून दाखवावी या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही माझ्या श्रद्धेच्या भावनेने मनातलं बोलली. जवळपास आमची ट्रेन यायला एकदीड तास बाकी होता. आता काहीच बघायचं नाही कल्पवृक्ष फॅमिली हॉटेल मधील आमचे ते शेवटचं जेवण… जेवण करून रेल्वे स्टेशन गाठले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला…*
*🙏पुनश्च एकदा वेळेवर संग्राम दादांनी आमची गाडीची वेळेवर सोय करून दिली तसेच भुरके दादा यांचे परफेक्ट नियोजनामुळे तसेच राहुल दादांचा मृदू आणि मितभाषी सोज्ज्वळ स्वभाव…परकेपणा जाणवलाच नाही आपण सर्व एक परिवारातील सदस्य आहोत. त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्थळांना भेटी घेऊ शकलो.म्हणून त्यांचे अंतःकरणातून आभार मानते…🙏 तसेच मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ पाटील ,पल्लवीताई,सविताताई, वैशालीताई,उरकुडेदादा,तसेच मुख्य आयोजक संग्राम दादा, तसेच भुरकेदादा आमच्या सोबत नसते तर आम्ही हे स्थळ बघू शकलो नसतो म्हणून त्यांचे कितीदा आभार मानले तरी कमीच आहे. मी सदैव त्यांच्या ऋणाईत…🙏🙏🙏*
*असा प्रकारे आमचा हा अर्जुनी कर साहित्यवारीचा प्रवास अविस्मरणीय, हदयात , डोळ्यात साठवणारा आल्हाददायक, सुखकर झाला… 😊😘*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*✍🏻सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿