‘व्यक्तीच्या कल्याणासाठी कुटुंब प्रबोधन महत्वाचे’; संजय कुलकर्णी
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: ” दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आर्थिक आव्हाने, ज्वलंत होत चाललेल्या समाजिक समस्या आणि प्रसिध्दी माध्यमातून जाणीवपूर्वक उभे केलेले चुकीचे विमर्श याचा परिणाम म्हणून स्वकेंद्रित आयुष्य जगण्याची वृत्ती आणि भोगवादाच्या अतिरेकातून वाढलेली चंगळवादी प्रवृत्ती यामुळे आजच्या काळात पुन्हा एकदा प्रत्येक व्यक्तीच्या चिरंतन कल्याणासाठी कुटुंब प्रबोधनाचे कार्य हाती घेणे आवश्यक आहे.
स्वभाषा, स्वदेश, राष्ट्रभक्ती यांची जपणूक आणि संवर्धन करण्याचे काम कुटूंबापासूनच सुरू होते ” असे प्रतिपादन कुटुंब प्रबोधन पश्चिम प्रांताचे प्रमुख, संजय कुलकर्णी यांनी ‘आधुनिक कुटुंब – वास्तव आणि अपेक्षा’ या खुल्या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.वेदांत सांस्कृतिक मंचतर्फे हा कार्यक्रम कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहामध्ये नुकताच आयोजित करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रीती पाटील, तृप्ती पाटील, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी, नगरसेवक राजाभाऊ बराटे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, समुपदेशक मिताली सावळेकर हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकरच्या अमानुष हत्याकांडाच्या निमित्ताने या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यात पाल्य आणि पालकांनी अंगिकारलेली आधुनिक जीवनपद्धती, आपल्या कुटुंब व्यवस्थेत एकंदरच आलेला बेबनाव, मुलांची बदलत चाललेली मानसिकता, वेगाने ढासळत चाललेली लग्न संस्कृती, समाज व्यवस्थेबाबतची उदासिनता अशा अनेक ज्वलंत विषयांवर विस्तृत चर्चा या परिसंवाद करण्यात आली.
शिक्षक, पालक, समुपदेशक, राजकीय कार्यकर्ते, पोलिस अधिकारी त्याचप्रमाणे, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींसह सर्व वयोगटातील सदस्य कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख वक्ते संजय कुलकर्णी यांनी भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. श्रोत्यांमधील मुलींना आधुनिकता, कुटुंबव्यवस्था, जगण्याचे वास्तव आणि आपल्या अपेक्षा या संकल्पनांबाबत व्यक्त होण्यास सांगण्यात आले. विद्यार्थिनींनी यास उत्तम प्रतिसाद दिला. त्यांनी पालकांबद्दल काही संयुक्तिक मुद्देही यावेळी चर्चा करताना मांडले. “पालकांनी कूल रहावे, मुलगा-मुलगी असा भेद थांबवावा, जे आई-बाबा ऑफिसमध्ये वरीष्ठ पदावर कार्यरत असतात, त्यांनी घरात तो मुखवटा घालून वावरू नये, तर साधे आई-बाबांसारखे वागावे,” अशा मुलींच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
कर्वेनगर मधील वेदांत सांस्कृतिक मंच गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असून गुढीपाडवा, स्वातंत्र्यदिन, सैन्य दलातील अधिकाऱ्यांचे सत्कार, गणपतीमूर्ती कार्यशाळा, योग शिबीर, हॅपी स्ट्रीट, वृक्षारोपण, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर असे विधायक व विविध समाजोपयोगी उपक्रम वेदांत मंचाच्या वतीने घेण्यात येतात.
वेदांत मंचाच्या मंजिरी जोशी,यांच्या पुढाकाराने आणि विनायक बेहेरे, सतीश आठवले,उमेश गानू, हेमंत सेलमोकर, विवेक बाखरे, जतीन तळेकर, मंदार जोशी, डॉ.भारवि जोशी, डॉ.रसिका जोशी, जयश्री धुपकर, डॉ प्रीतम सेलमोकर यांच्या सहकार्याने परिसंवाद कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.