पोलीस पाटीलांचा उद्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार मोर्चा
नागपूर: महाराष्ट्र राज्य गावं कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने गुरुवारी २२ डिसेंबर रोजी विधानभवनावर भव्य मोर्चा धडकणार. गेल्या काही वर्षापासून शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून सर्व 34 जिल्ह्यामधून सर्व पोलीस पाटील नागपूर शहरात या मोर्चामध्ये सहभागी होतील. जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकसंख्या यामध्ये सहभाग घेणार असल्याचे विजयराव घाडगे यांनी पत्रपरिषदेचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये विजयराव घाडगे पाटील यांच्या नेतृत्वात पत्रपरिषद घेतेवेळी सोबत निरंजन गायकवाड पाटील आणि यशवंत ईरदंडे पाटील उपस्थित होते.
राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली मात्र सरकारने गंभीरतेने विचार केला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ तसेच इतर संघटना आक्रमक झाल्या आहे. बुधवार दिनांक 22 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर राज्यातील हजारो पोलीस पाटील धडक देणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे.
राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील परीश्रम घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी संपुर्ण राज्यभर दौरे करुन पोलीस पाटीलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपुर्ण राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान 18 हजार रुपये मिळावे, निवृत्तीचे वय साठ वर्षा वरून 65 वर्षांपर्यंत करण्यात यावे, निवृत्तीनंतर किमान पाच लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पद भरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, शासनातर्फे पोलीस पाटलांचा पाच लाख रुपयाचा विमा उतरण्यात यावा आणि त्यांचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे
शासनाकडून पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम मिळावा तसेच कार्यरत पोलीस पाटील मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस पाटील म्हणून अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे, प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये मानधनासोबतच मिळावेत, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे, गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये एखादा पोलीस पाटील मरण पावल्यास त्या पोलीस पाटलास कुटुंबीयांना नोकरी आणि वीस लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्या घेऊन राज्यातील पोलीस पाटील अधिवेशनावर धडक देणार आहे.