पैंजण ते पायपट्टीचा ‘रुणझुणणारा प्रवास’; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
‘रुणूझुणू तुझ्या पैंजणाची
निनादे माझ्या अंतरी
तुझ्या सुगंधाने न्हाहते
माझ्या जीवनाची कस्तुरी..’.
पैंजण… सोळा शृंगारापैकी एक शृंगार. स्री सुलभ भावनांचा अविष्कार. प्रत्येक स्त्रीच्या घरातील अस्तित्वाचा गजर. लहान बाळाला तसेच वयात आलेल्या मुलींनीही आवर्जून पायात घालण्याचा दागिना. विवाहित स्त्रियांनाही लग्नात सौभाग्य लेणं म्हणून दिलेले महत्वाचं समजल़ं जाणारं ‘वाण’..! आठवतंय…घरात बाळ चालायला लागलं की, त्याच्या पायातील पैंजणांना लावलेल्या घुंगरांच्या आवाजाने साऱ्या घराच्या आनंदाला आलेलं मुक्त उधान.धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे या पैंजणाला. चांदीमुळे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध, रक्ताभिसरण, प्रतिकारशक्ती आणि हार्मोनल संतुलन.
सुप्रसिद्ध कवयित्री नीलम माणगावे यांनी चार पिढ्यांचा संदर्भ देत पैंजण खूप छान रेखाटले आहे. होय, आठवतात ना मला..! आजीच्या पायातील ते दोन दोन किलो वजनाचे भक्कम पैंजण. त्या काळी रूढी परंपरेने तिला पैंजणात इतकं जखडून ठेवलं, की त्यातून ती कधी बाहेर आलीच नाही. तिने स्वतःचे विश्व स्वयंपाक घरापुरतेच मर्यादित ठेवलं, अन् सारं काही निमुटपणे स्वीकारले. आई मात्र थोडी वेगळी ठरली. तिने पैंजण ऐवजी तोरड्या पसंत केल्यात. वजनही कमी केलं पैंजणांचे अन् बंधनांचे. पण बंधन झुगारणं तिलाही शक्य झालं नाही. स्वयंपाक घरातून भले निघाली असेल ती बाहेर. पण घराचा उंबरठा ओलांडायला कुठे जमलं तिला?
…आणि त्याच्या पुढच्या पिढीतली ‘मी’. पैंजणांचं, तोरड्यांचं वजन नको म्हणून पायात पट्टीचे पैंजण घालायला लागली. घुंगरांची रूणझुणही कमी झाली. मी बाहेर पडली स्वतःच्या बळावर…!
‘कधी कल्पना चावला म्हणून आकाशात विहंगली
अग्निवीर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगू लागली,
सावित्री जिंदाल म्हणून सर्वाधिक श्रीमंत ठरली
द्रौपदी मुर्मु बनत देशाची राष्ट्रपती बनली..!’
माझ्या पुढच्या पिढीचा काय अंदाज लावू. त्यांच्या पायात कदाचित पैंजण नसतीलही. परंतु संपूर्ण जगाला मुठीत घेतल्याशिवाय स्री राहणार नाही हा दुर्दम्य आत्मविश्वास मात्र मला निश्चित आहे.
‘मराठीचे शिलेदार समूह’ मराठी भाषा सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यरत असतो. सोबतच स्त्रियांना नेहमीच मानाचे पान, मानाचे स्थान देणारे या समूहाचे सर्वेसर्वा राहुल सरांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘रूणूझुणू पैंजणांची’ हा विषय दिला आणि सर्व काव्यप्रेमींना आपले विचार चक्षुतून नवे काही करण्याचे आवाहन केले.
‘रूणूझुणू पैंजणांची वाजवून किती गहिवरलो मी,
पैंजण तुझे हाती घेऊन किती नाचलो मी ….!’
यासारखा भावनांचा सुंदर खेळ. ‘तुझ्या सुंदर पैंजणांनी मी वेडा झालोय प्रेमात पडलो तुझ्या मी मोहून गेलो.’ असा प्रेमाचा अनोखा मेळ.. ‘रुणुझुणु पैंजणाचं गुंजन राक्षसी डोळे पाही मनोरंजन.’ यासारखा वज्र प्रहार. ‘रूणूझुणू पैंजणांची हलक्या हलक्या ध्वनी जणू वारा सुगंधी वाहे गर्भारलेल्या तृप्त रानी.’ अशी शब्दालंकाराची अनोखी खेळी आणि काव्यलेखकांचा नानाविविध, अप्रतिम अविष्कार.
खरंच खूप विविधता आणि सुंदर भावनांचा खेळ पहावयास मिळाला विविध कवितांमधून. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन व पुढील काव्य प्रवासास अनंत शुभेच्छा..!
लिहित राहूया, वाचत राहूया, विचारांना प्रगल्भ बनवूया आणि एक दर्जेदार काव्य निर्मितीचा संकल्प करू या..!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,कवयित्री, लेखिका,प्रशासक