“पत्रलेखन कला मोबाईलच्या जमान्यात कालबाह्य होत आहे”;भाग्यश्री देसाई
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी
पुणे: पत्रलेखन ही एक कला आहे. एकेकाळी दूर गावी असलेल्या आपल्या माणसासाठी, सुखदुःखाचा संदेश घेऊन येणारं पत्र हे एकमेव माध्यम होतं, पण आता मोबाईलच्या जमान्यात पत्रातून मजकूर लिहीण्याची कला मात्र कालबाह्य होत आहे” असे मनोगत प्रसिध्द सिनेनाट्य अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांनी पत्रलेखन स्पर्धेच्या बक्षीस समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना व्यक्त केले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे’ – कर्वेनगर भाग आणि ‘जनमित्र सेवा संघ’ यांनी संयुक्तपणे राज्य स्तरीय मराठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ग्रामीण व शहरी असा स॔पूर्ण राज्यभरातून स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
यशस्वी स्पर्धकांना शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा तीन गटातून बक्षिसे वितरीत करण्यात आली. स्पर्धा घेणा-या संयोजकांचे आणि पत्रलेखनात यशस्वी झालेल्या विजेत्यांचे भाग्यश्री देसाई यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेचे संयोजक आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना स्पर्धेचा हेतू विशद केला. रोटरी क्लबच्या उपाध्यक्ष,डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
पत्रलेखनात रस असणारे, लेखन-वाचन संस्कृती जपणारे, तसेच संयोजक संस्थेचे सदस्य व पदाधिकारी कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते.