
धक्कादायक..! भारतात दर तासाला रस्ते अपघातात होतात १८ जणांचा मृत्यू; नितीन गडकरी
नवी दिल्ली: देशात दर तासाला सरासरी 18 जणांचा रस्ते अपघातात (Accident) मृत्यू होतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संसदेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात दर तासाला सरासरी 18 लोक रस्ते अपघातात मरतात. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये देशात एकूण 1.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात नितीन गडकरी म्हणाले की, 2021 मध्ये देशात रस्ते अपघातात 153972 जणांना आपला जीव गमवावा लागला.
नितीन गडकरी यांनी सांगितलं की, रस्ते अपघातात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर तर मृत्यूच्या आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील रस्ते अपघात 2021 च्या अहवालानुसार हा आकडा समोर आला आहे.
*या कारणांमुळे रस्ते अपघात -*
ओव्हर स्पीडिंग
मोबाईल फोनचा वापर
अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवणे
चुकीच्या बाजूने वाहन चालवणे
हेल्मेट न वापरणे
सीटबेल्ट न वापरणे
संसदेत माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलत आहे. लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी सरकारने सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे अनेक मोहिमा चालवल्या आहेत. याशिवाय रस्ता सुरक्षा लेखापरीक्षकांसाठी अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जात आहेत. समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठी एअरबॅग अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय सीट बेल्ट रिमाइंडर, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम, ओव्हर स्पीड वॉर्निंग सिस्टीम यासारखे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत.