“ज्ञान आणि कौशल्य यांच्या सहसंबंधातून प्रेरणा जाग्या होतात”
_डाॅ. महेंद्र सेठिया यांचे प्रतिपादन_
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: “मुलांमध्ये कुतूहल, उत्सुकता, जिज्ञासा असते, म्हणून त्यांना अनेक गोष्टी करून पहाव्याशा वाटतात. मुलांना जेव्हा पालक विविध अनुभव देऊ बघतात, तेव्हा ते नवे अनुभव घेऊन पचविण्यासाठी मुलांना काही वेळ लागतो. हे गृहीत धरून तेवढा वेळ मुलांना द्यायला हवा आणि तोपर्यंत मोठ्यांनी थोडा धीर धरायला हवा. कारण ज्ञान, कौशल्य, आणि वृत्ती यांच्या सहसंबंधातून प्रेरणा जाग्या होतात “असे प्रतिपादन प्रसिध्द बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र सेठिया यांनी “मुलांचं भावविश्व समजून घेताना” या परिसंवादात “प्रेरणा जागरण” या विषयावर बोलताना केले.
पुण्यातील “ज्ञानप्रबोधिनी” संस्थेच्या “प्रज्ञा मानस संशोधिके” च्य वतीने नुकतेच या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमधील उर्जेला विधायक वळण देण्याच्या संकल्पनेवर आधारीत या परिसंवादामध्ये ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. गिरीश बापट, डॉ. वनिता पटवर्धन, डॉ. अनघा लवळेकर हे मान्यवर सहभागी झाले होते.
बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी परिसंवादात बोलताना आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, “विधायक उपक्रमांतून बालविकास”
हे आमच्या बालरंजन केंद्राचे ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार आम्ही अनेक उपक्रम राबवितो. मैदानावर मुले घडतात,असा माझा अनुभव आहे. मैदानी खेळातला आनंद गवसला की, मुलं जगण्यातला आनंद घ्यायला शिकतात. मुलांमध्ये भरपूर उर्जा असते. या उर्जेला विधायक वळण देण्याची सुरूवात लहानपणापासूनच करावी लागते.” परिसंवादास राज्यभरातून विविध ठिकाणचे ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते, मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.