‘सत्य कटू असते, सत्याला भीती कशाची?’; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_
अरे!!! लोकांचं काय घेऊन बसलास तू ? ते बोलतच राहणार आहेत आयुष्यभर, तू खरं बोल की खोटं. ऐकलंच असेल ना लोक पायीही चालू देत नाही अन् घोड्यावरही बसू देत नाही..! पण सत्याची कास जर धरली असेल तर, भीतीची तमा नसते, याची जाणीव आहे ना तुला??
सत्येन पन्था विततो देवयानः ।
यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥
शेवटी विजय सत्याचाच होतो म्हणून, तर आपले राष्ट्रीय ब्रीद आहे ‘सत्यमेव जयते’. सत्य तेच खरे? शंका यावी तुझ्या मनात ? मला तर आश्चर्य वाटतं. अहिंसेच्या मार्गावर चालतांना ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले ते महात्मा गांधीजी सुद्धा ईश्वर म्हणजे सत्य, प्रेम आणि नीती होय असे मानत.
“सत्य हेच खरे?का मनात शंका, जप ना तुही गांधीजींचा वारसा,
भले तुजकडे नसे पैसा अडका, सत्वशिल चारित्र्य हाच खरा आरसा.,”
बरे सत्य बोला, बरे सत्य चाला.
बहु मानती लोक,येणे तुम्हाला.
संत रामदासांच्या या ओळींनीही सत्याचे महत्व अधोरेखित केले ना ?आणि होय.. ते कटू असते ..परंतु खरे असते. ते कधी मर्मी घावही घालते….परंतु चिरकाल टिकते. होय ते पडदा फाडते…परंतु वास्तविकही असते. ते भुरखाही उतरवरते. कारण ते निर्भीड असते. सत्य….. बहुतांशी ते एकटेच असते, बऱ्याचदा ते प्रश्नांच्या कचाट्यात सापडते.
काही वेळा ते सहवासाने समजून येते तर काही वेळा ते स्वतः परिस्तिथी सापेक्ष समजूनही घेते. त्याची जाहिरात मात्र करावी लागत नाही.. स्वतः अनुभूती घ्यावी लागते.
अरे, आपण जन्माला आलो तेव्हापासून सत्य हे संस्काराच्या रूपात असते तर मरते वेळी ‘राम नाम सत्य है’ l समजले का? पुन्हा तुझा तोच प्रश्न… सत्य तेच खरे? होय…. खरेच !!! सत्याला भीती कशाची ? अन् कुणाची? आहे ते आहे…मग तत्वांशी प्रतारणा का करावी ? मान्य आहे मला सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो. पण, सत्य कधीच हरत नाही विजयीच राहते. मग ते कसे खोटे ?? सत्याच्या श्रीमंतीत सारं आयुष्य आनंद उपभोगता येतो, शांत झोपही येते. माहिती आहे….! कधी कधी असत्य असं सजवलं जातं की ते बेगडी सत्य भासते पण, हा क्षणभर टिकणारा भास असतो एवढे लक्षात ठेव. झाले ना समाधान?
“सत्य स्वर्गाचा साक्षात्कार, असत्य नरकाची खाण,
सत्य ईश्वराचे दुजे नाव, सत्य शिवाहून सुंदर जाण..”
आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समुहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सत्य तेच खरे?हा तात्विक विषय दिला. पुन्हा एकदा चैत्र पालवी प्रमाणे सर्वांची लेखणी बहरायला लागली. सर्व कवी कवयित्रींना सलाम..!
पण थोडे काही… आजचा विषय खरोखर आव्हानात्मक होता. सत्य तेच खरे? यातले प्रश्नचिन्ह खूप विचार करायला लावणारे आहे. तसे पाहता सत्य आणि खरे या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा निश्चितपणे प्रश्नाच्या दोन्ही अंगांचा विचार होणे आवश्यक आहे. अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक, पण सत्याची नकारात्मक बाजू म्हणजे असत्य… ज्याचे आपण आपल्या लेखणी द्वारे कधीही समर्थन करू शकत नाही. बहुतांशी रचना या मला तरी एकांगी वाटल्यात. आपण प्रगल्भतेकडे वाटचाल करीत आहोत आणि निश्चित यात यशस्वी होणार यात शंकाच नाही. पुनश्च सर्वांचे खूप खूप अभिनंदन व भावी साहित्यप्रवासास भरभरून शुभेच्छा..!
सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह