कळपातील गायीची वाघाने केली शिकार
_दांडेगाव जंगलातील घटना पशुपालकाचे तीस हजारांचे नुकसान_
भिमराव मेश्राम, लाखांदूर तालुका प्रतिनिधी
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात चराईसाठी
सोडण्यात आलेले पशुधन चराई झाल्यानंतर घराकडे परतत असतांना अचानकपणे वाघाने कळपातील एका गाईवर हल्ला करून शिकार केल्याची घटना दांडेगाव जंगल शिवारात दि. १२ एप्रिल रोजी साय. ४ वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेत दांडेगाव येथील पशुपालक काशीराम नखाते या पशुपालकांचे ३० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. लाखांदूर तालुक्यातील अनेक गावे ही जंगल व्याप्त परिसरात वसलेली आहेत. शेती व्यवसाय डबघाईस येत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत आहे. अशाच प्रकारे काशीराम नखाते सुद्धा शेतीला जोड व्यवसाय म्हणून मागील काही वर्षांपासून पशुपालन करीत आहेत. नखाते यांनी नेहमी प्रमाणे आपली जनावरे ही दांडेगाव जंगलात चराईसाठी सोडलेली होती.
जनावरांची चराई झाल्यानंतर तीन वाजताच्या सुमारास घराकडे जनावरे परत आणत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने गाईच्या कळपावर हल्ला चढवीला. हल्ल्यात कळपातील एका गाईची शिकार केली. वाघाने गाईची शिकार करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पसार झाला. व अन्य उर्वरित पशुधन घरी आणले. या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात बिट रक्षक अनिल सावसाखळे, एस जी खडागले, जी डी हाथे व वनमजूर यांनी घटना स्थळी पोहचत घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेत पशु पालकाचे तीस हजार रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
_वनविभागाचे आव्हान_
जंगलात मोह फुलं वेचण्यासाठी एकट्याने जाऊ नये तसेच यांनी सुद्धा समूहाने जंगलातच जावे असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांनी केले आहे.