“संवेदनांचा अनुवाद होऊ शकत नाही”; – डॉ. दामोदर खडसे
_मराठी स्त्री कविता अनुवादाचे प्रकाशन_
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: “भारतीय साहित्यात एकूणच अनुवादाची मोठी परंपरा असून अनेक व्यक्ती व संस्था यासंदर्भात मोठे कार्य करीत आहेत. अंतरभारतीचे याविषयात मोठे काम आहे. अंतर भारतीय भाषांमध्ये अनुवादाच्या माध्यमातून साहित्याची देवाणघेवाण आणि संस्कृतिचे आदान-प्रदान होत असते. एका भाषेतून दुस-या भाषेत साहित्य भाषांतरीत करणे सध्या गुगल, ए आय अशा सुविधांमुळे फार सोपे झाले आहे, परंतु आधुनिक डिजीटल तंत्राद्वारे भाषांतर करता आले तरी संवेदनांचे अनुवाद होऊ शकत नाहीत.
त्यासाठी मानवी हृदयात पाझरणा-या भावनाच अनुवादातले भावार्थ व्यक्त करू शकतात. जसे अत्तर एका बाटलीतून दुस-या बाटलीत ओतताना हुगंध दरवळतो तसा संवेदनांचा दरवळ पसरवू शकेल तोच खरा अनुवाद, फक्त मानवी प्रतिभाच करू शकते”असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, अनुवादक डॉ. दामोदर खडसे यांनी अंतर भारती पुणे शाखेच्या वतीने आयोजित एका प्रकाशन समारंभात बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉ. मंदा खांडगे उपस्थित होत्या. डॉ. अश्विनी धोंगडे आणि कवयित्री आसावरी काकडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती.
या कार्यक्रमात डॉ. नीलिमा गुंडी आणि कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या “समकालीन मराठी स्त्री कविता” या खंडाचा सुनीता डागा यांनी केलेल्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन डाॅ. दामोदर खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यात हिंदी काव्य अनुवादासाठी मराठीतील सध्याच्या 500 कवयित्रीमधून 29 कवयित्रींची निवड करण्यात आली आहे. स्व.साने गुरुजी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम एस एम जोशी सभागृहाच्या काॅन्फरन्स हाॅल येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात पुणे,महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारीणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी डाॅ.मंदा खांडगे यांनी मनोगत व्यक्त करताना विविध स्तरातील स्त्री कवयित्रींच्या लेखनपरंपरेचा आढावा घेताना आत्मभान आलेल्या समकालीन कवयित्रीच्या अभिव्यक्तीचे दर्शन घडवणारा मौलीक संदर्भग्रंथ म्हणून प्रकाशित काव्यानुवादाचे महत्वं स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी बदलत्या काळानुसार स्त्रियांची अभिव्यक्ती अधिक समर्थ होत गेली, परंतु त्यामानाने समाजपुरूष अजुन बदलेला नाही,असे चिंतन व्यक्त केले. अंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सविता कुरुंदवाडे यांनी केले. उत्तरार्धात ‘समकालीन मराठी स्त्री कविता’ या संग्रहातील हिंदी काव्य अनुवादाचे सादरीकरण कल्पना देशपांडे, प्रतिमा जगताप, कल्पना शिरोडे इत्यादी कवयित्रींनी केले. कार्यक्रमास अनुवाद क्षेत्रातील अनेक मान्यवर अंतरभारतीचे सर्व पदाधिकारी आणि कवी- कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.