“विझलेल्या दिव्याला काडी लावण्याची इच्छा नाही”; रावसाहेब दानवे
_चंद्रकांत खैरे हे विझलेला दिवा….!_
रत्नागिरी: मराठवाडा विभागातील औरंगाबाद येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेला भाजपाने आर्थिक रसद पुरवली, असा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी केला होता. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टोमणा मारला “विझलेल्या दिव्याला मी काडी लावू इच्छित नाही” तुम्ही वारंवार मला विचारून विझलेल्या दिव्याला आगकाडी लावायला लावू नका, असे ते म्हणाले, आज ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरोना काळात आपले छत्र गमावलेल्या कुटुंबियांना केंद्राकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. या निमित्त दानवे रत्नागिरीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दानवेंनी विविध प्रश्नांना उत्तर दिली. दानवे म्हणालेत, राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकरी, विद्यार्थी रोजगार, विकासकामे या सगळ्या प्रश्नांवर अपयशी ठरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षात मंत्रालयात आलेले नाहीत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत त्यांनी दोन वर्ष काढली. राज्यातील बारा कोटी जनता ही आपली जबाबदारी आहे, याचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही. गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे हे राजे आहेत, त्यांना आपण कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाऊ देता कामा नये, अशी भूमिका घेत राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. त्यामुळे राजेंचा योग्य सन्मान कुणी केला आणि शब्द कोणी मोडला हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही, असे दानवे म्हणालेत.