संजय राठोड यांना ‘क्लिन चीट’; मंत्रिपद देण्याची समर्थकांची मागणी
_पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण_
मुंबई/पुणे: संपूर्ण राज्यात गाजलेल्या बहुचर्चिच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली असून; यासंदर्भात पोहरावदेवीच्या महंतांनी आज दि ११ जून रोजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली.
_मंत्रिपद देण्याची समर्थकांची मागणी_
माजी वनमंत्री संजय राठोड हे पोलिसांच्या अहवालानंतर निर्दोष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावे अशी मागणी राठोड यांच्या समर्थकांनी केली असून, यासाठी समर्थकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उद्याची वेळ मागितली आहे. त्याप्रमाणे त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करणार असल्याचे समर्थकांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे संजय राठोड पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात निर्दोष असल्याने त्यांना पुन्हा मंत्री बनवण्यात भाजपची कोणतीही अडचण नसल्याचे फडणवीस म्हणाले.
_चौकशी अहवाल मागितला_
माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत पोलिस चौकशी अहवालच्या मागणीसाठी पोहरादेवीचे सहा महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज,आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार, ॲड अभय राठोड यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेतली.
_पूजाचा मृत्यू हा आकस्मिक_
ॲड अभय राठोड म्हणाले, बंजारा समाजाचे महाराष्ट्रत सुमारे दोन कोटी लोक असून संजय राठोड हे त्यांचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, त्यांना आरोप झाल्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि समाजाचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. याप्रकरणी नेमके आरोप झालेल्या केसची वस्तुस्थिती काय आहे यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्त यांची आम्ही भेट घेतली. पोलिसांनी आम्हाला या केसचे समरी पत्रक दिलेले असून त्यात पूजा चव्हाण यांचा मृत्यू आकस्मिक मयत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.