बंडखोरी हिंदूत्वाएवजी ओबीसी मुद्द्यावर का नाही…?
(लेखाचा पूर्वार्ध)
2019 ला अजित पवारांसोबतचा पहाटेचा झिम्मा फेल झाल्यानंतर पुढच्या नव्या झिम्म्याची जबाबदारी फडणवीस यांनी अजित पवारांवरच टाकली. मविआ सरकारच्या एक ते दिड वर्षात किंवा जास्तीतजास्त दिड ते दोन वर्षात फडणवीस व अजित पवारांनी अशी काही परिस्थिती निर्माण करावी की, जेणे करून शिवसेनेचे आमदार आपोआप फडणवीसांकडे आश्रयाला आलेच पाहिजे. बाहेरून फडणवीसांनी ईडी-सीबीआयचा दबाव निर्माण करून ‘पूल’ करायचे व मविआतून अजित पवारांनी शिवसेना आमदारांना अपमानास्पद वागणूक देऊन ‘पूश’ करायचे असे हे षडयंत्रकारी धोरण होते. अजित पवार हे जात्याच सरंजामदार असल्याने ते शिवसेना आमदारांचा अपमान करण्यात कुठेच कमी पडणार नाहीत, याची खात्री पेशवा फडणवीसांना होतीच!
दुसरा दुय्यम मुद्दा उद्धव ठाकरेंचा आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मवाळपणा व त्यात आजारीपणाची भर पडल्याने षडयंत्राला नकळतपणे सपोर्टच मिळाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही ते मवाळपणामुळे अजित पवारांच्या नाकात वेसण घालू शकले नाहीत व आजारपणामुळे आपल्याच पक्षाच्या आमदारांना अटेंड करू शकले नाहीत.
तिसरा आणखी एक तिय्यम मुद्दा- कमी वयात लायकी नसतांना जास्त काही मिळाले की, कुणीही माणूस बिघडतो व आपल्याच पायावर दगड पाडून घेतो, असा काहीसा प्रकार आदित्य ठाकरेबाबत झाला आहे. आपल्यापेक्षा सिनियर व पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात चूकीचा हस्तक्षेप करणे हे कोणालाही आवडणार नाही, त्यातून आमदारांचा ईगो जागृत होणे व तो दुखावणे आलेच! पूत्रप्रेमापोटी आंधळ्या धृतराष्ट्राने जे केले तेच आजारी उद्धव ठाकरेंनी केले.
चौथा आणखी एक मुद्दा हा आहे की, मविआ सरकार स्थापनेत अनंत अडचणी आल्या होत्या. कॉंग्रेस श्रेष्ठी परवानगीच देत नव्हते. भाजपाई राज्यपाल घोळ घालत होते. त्यात पुन्हा मध्येच अजित पवार पहाटे उठून निघून गेलेत, त्यांना परत आणण्यासाठी बर्याच कसरती कराव्या लागल्यात. या सर्व अडचणींवर मात करून कसेतरी मविआ सरकार स्थापन झाले व ‘‘सत्तेसाठी काहीही’’ हे ब्रिदवाक्य असलेल्या राष्ट्रवादी, कॉंग्रेसी व शिवसैनिक आमदारांना सत्तापदे मिळालीत. उद्धव ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत भाजपा नकोच होता. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिनही पक्षांच्या प्रमुखांना केवळ भाजपा नको म्हणून मविआ सरकार टिकवून ठेवणे ही काळाची गरज वाटत होती. या सरकारला धोका पोहोचवू शकणारी एकच व्यक्ती मविआमध्ये होती, ती म्हणजे- अजित पवार! त्यांनी ते सिद्धही करून दाखविले होते. ‘‘नंगे को खुदा डरे’’ या न्यायाने मविआ सरकारमध्ये अजित पवारांचे महत्व वाढले, अर्थमंत्रीपद व उपमुख्यमंत्री ही दोन्ही मोक्याची व मार्याची पदे त्यामुळेच त्यांना मिळालीत. अजित पवार नाराज झालेत तर, ते एखाद्या दिवशी अचानक पहाटे उठून फडणवीसांच्या दारी जाऊन बसतील व आपले मविआ सरकार पाडतील, या एकमेव दहशतीपोटी मविआचे आमदार ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करीत होते. बुक्क्यांचा मार सहनशक्तीपलीकडे गेल्यावरच बंड उजागर झाले.
महाभारतात पितामह भिष्म नाईलाजाने कौरवांच्या अधर्मी पारड्यात वजन टाकतात, तो नाईलाज काय होता? पितामह म्हणतातः ‘‘अर्थस्य पुरूषः दासः’’ माणूस अर्थाचा गुलाम आहे. पितामहाच्या ऐषआरामाची रोजी-रोटीच दुर्योधनाच्या छावणीत होती. अजित पवारांनी आपल्या सरंजामीपणाचा बडगा केवळ हीन वागणूक देण्यासाठीच वापरला नाही तर, त्यांनी या आमदारांच्या आर्थिक नाड्याच आवळून धरल्यात. मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी अर्थमंत्रालयाकडून मिळाला नाही तर विकासाची कामे होणार नाहीत व जनतेला काय कामे केली हे सांगता येणार नाही. मतदारसंघात विकासाची जी कामे करवून घ्यायची असतात ती ठेकेदारांकडून करून घ्यायची असतात. हे ठेकेदार अर्थ-साखळीतील फार महत्वाचे दुआ असतात. ते कार्यकर्त्यांना पोसतात व निवडणूकीत कळीची भुमिका निभावतात. सभा-सम्मेलनाला ट्रका भरून गर्दी आणणारे हेच ठेकेदार असतात. शिवाय या विकासाच्या कामातूनच टक्केवारीची कमाई आमदाराला करोडपती बनवीत असते. अजित पवारांनी या अर्थसाखळीचाच गळा घोटला होता. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या अभिनंदनाचे प्रचंड फ्लेक्सबोर्ड लावणारे हेच ठेकेदार आहेत.
आतापर्यंतच्या विवेचनावरून एक सिद्ध झाले आहे की, या बंडाच्या मुळाशी हितसंबंधांना आलेली बाधा आहे. हे हितसंबंध जसे आर्थिक असू शकतात तसे मानापमानाचे (ईगो) मानसिकही असू शकतात. मग, जर मूळ कारण आर्थिक व मानसिक असेल तर यात हिंदूत्वाचा संबंध आला कूठून?अडीच वर्षांपूर्वी जेव्हा मविआ सरकार स्थापन झाले, तेव्हा हिंदुत्वाची आठवण का आली नाही? आणी आता हिंदूत्वाची आठवण येण्यासाठी अडीच वर्षे लागतात काय? अडीच वर्षांपासून ज्या सत्तापदांवर हे बंडखोर होते, ती सत्ता हिंदुत्वाशिवायच होती ना? या सर्व प्रश्नातून एकच उत्तर बळकट होते, आणी ते म्हणजे- ‘‘अर्थस्य परूषः दासः’’ मग पुन्हा नव्याने तोच प्रश्न आ वासून उभा राहतो- हिंदूत्वाचा मुद्दा आला कसा?
कोणत्याही घरात मतभेद वा कलह माजला असेल तर घराच्या प्रमुखाने ताबडतोब त्याची दखल घेऊन त्यातील अंतर्विरोध लोकशाही मार्गाने सोडविला पाहिजे, हे महामानव बुद्धाच्या भिक्खूसंघाचे मुख्य सूत्र होते. त्यामुळे बुद्धाच्या हयातीत अनेक प्रसंग आले असतांनाही भिक्खूसंघात कधीच फूट पडली नाही. त्याकाळी बुद्धासमोर प्राचीन गणसमाजाच्या स्त्रीसत्ताक लोकशाहीचा आदर्श होता. *आजच्या प्रगल्भ भांडवली लोकशाही युगात मात्र घराणेशाही व हुकूमशाहीचाच आदर्श ठेवला जातो, आणी म्हणून बंडखोरी होणे, फूट पडणे हे नित्याचेच झालेले आहे.
कोणत्याही घरात असंतोष माजल्यानंतर बंडखोर निर्माण होत असतात. मात्र बंडखोर आपले बंड जाहीर करण्याआधी घराबाहेर सुरक्षितता शोधत असतात. सुरक्षित मुद्दा नसेल तर कुणीही आहे ते घर सोडण्याचे धाडस करीत नाही. चंद्रगुप्त मौर्याने चाणक्याच्या छळाला कंटाळून त्याच्या ब्राह्मणी धर्माला तेव्हाच लाथ मारली, जेव्हा त्याकाळी जैन धर्माचे संरक्षण त्याला मिळणे शक्य होते. सम्राट अशोकाने वैदिक ब्राह्मणी धर्माला लाथ मारून बौद्ध धम्म स्वीकारला, कारण ज्या प्रजेवर तो राज्य करीत होता, ती प्रजा बौद्धमय झालेली होती. संत ज्ञानेश्वरांना वैदिक ब्राह्मणी धर्माने नाकारल्यानंतर नवनाथ धर्माचा आश्रय घेतला, कारण त्याकाळात नवनाथ धर्म हा अब्राह्मणी होता व भारतभर लोकप्रिय होता, ब्राह्मणांपासून जीव वाचविण्यासाठी ज्ञानेश्वरांनी नाथ धर्मात सुरक्षितता शोधली. “छत्रपती शिवरायांनी ब्राह्मणांच्या छळाला कंटाळून ब्राह्मणी वैदिक धर्म त्यागला व अब्राह्मणी शाक्त धर्म स्वीकारला, कारण त्याकाळात शाक्त धर्म लोकप्रिय होता. शिवरायांनी तेथे सुरक्षितता शोधली.” महाराष्ट्रातील बंडखोरांच्या सुरक्षित वाटेचा शोध व बोध आपण उद्या लेखाच्या उत्तरार्धात पाहू या! तोपर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!…..
लेखक- प्रा. श्रावण देवरे
s.deore2012@gmail.com