राज्यसभेवर जाण्यासाठी सोडले सौरभ गांगुलीने अध्यक्षपद..?
भाजपकडून सौरभ गांगुली यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे जाणकारांचे मत आहे. भारताच्या माजी कर्णधाराला राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी त्यांची प्रकृती खालावली तेव्हा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. अशा परिस्थितीत गांगुली बंगालमध्ये भाजपचा चेहरा बनण्यास तयार होणार का? हे गुपीत असले तरी सध्या गांगुली यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने ट्विट करत बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडण्याचे संकेत दिल्याचे वृत्त आहे. ट्विटमध्ये सौरव गांगुलीने लिहिले की, “माझ्या क्रिकेट प्रवासाला १९९२ मध्ये सुरुवात केली होती. आता २०२२मध्ये कारकीर्दीचे ३०वे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. मी प्रत्येक व्यक्तीचे आभार मानू इच्छितो जो या प्रवासाचा एक भाग आहे, मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यास मदत केली. आज, मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याने मला वाटते की, कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मला आशा आहे की, माझ्या आयुष्याच्या या नवीन प्रवासात तुमचा पाठिंबा कायम राहील,”असे बीसीसीआय सौरव गांगुली याने ट्विट करत लिहिले आहे.
महत्त्वाचं म्हणजे, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतीच अमित शाह यांच्यासोबत भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. बंगालमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर या अटकळांना पूर्णविराम मिळाला. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आणि अमित शहांसोबत डिनरमध्ये सहभागी होण्याच्या कथेवर गांगुली म्हणाले की, मी अमित शाह यांना २००८ पासून ओळखतो. खेळतानाही मी त्यांना भेटायचो. यापेक्षा जास्त काही नाही.