मानवाच्या अखंड प्रखर साधनेचं फळ
मानवी सामर्थ्याचा दिव्यशक्तीरुपी प्रगती स्त्रोत म्हणजे विज्ञान.. एकेकाळी कंदमुळे व वल्कले यावर जीवन कंठणारा माणूस विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रखर शोध उपासनेने अशक्य गोष्टी शक्य केल्या व पक्ष्याप्रमाणे आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पाहाणारं त्याचं मन आता प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या साधन साहाय्याने आकाशात विहरू लागलं.. स्थलकालावर मात करून विमानाच्या साह्याने अंतराळाला गवसणी घालू लागलं..संपूर्ण आधुनिक युग गतिमान झालं.. विमानाच्या साह्याने विश्वाची परिक्रमा करू लागलं.. हे सारं मानवाच्या अखंड प्रखर साधनेचं फळ.. त्याची उत्क्रांती किमया केवढी सुखद आणि आनंद रोमांच फुलवणारी..
तंत्र बिघाड
विमान अपघात
जन आघात
पण मानवाच्या मनमर्जीने चालणाऱ्या या आधुनिक तंत्रात जर आकस्मिक बिघाड आला तर मात्र हेच तंत्रज्ञान माणसावर आरूढ होते व त्याच्या भयावह विध्वंसाला सामोरं जावं लागतं…अपरिमित जिवित व वित्तहानी परिणामाच्या अनंत यातनांना आजन्म भोगावं लागतं.
होय..या गतिमान जीवन विध्वसाचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजे कोझिकोड विमानतळ. आजही त्या आठवांची खोल जखम मनावर भयानक काटा उभं करणारी..न संपणाऱ्या तीव्र वेदना देणारी 8 आॅगस्ट 2020 ची ती घटना. प्रत्येक देश कोरोनाच्या कहरातून जात असताना दुबईत अडकलेल्या भारतीयांना वंदे मातरम मिशनच्या विद्यमाने दुबई वरून भारतात आणले जात असताना. त्या शुक्रवारच्या रात्री केरळ येथील कोझिकोड विमानतळावर उतरताना तेज गतीमुळे विमान घसरून 35 फूट दरीत कोसळले. त्या भयानक आकांतरूपी प्लेन क्रॅश अपघाताचे नेमके क्षण टिपण्यासाठी आ. राहुल सरांनी हे वास्तववादी चित्र दिलेलं.. घटनेचा नेमका वेध घेऊन आंतरप्रतिभेने,संवेदनशीलतेने अभ्यासूवृत्तीने विषयाचं गांभिर्य लक्षात घेऊन कविवर्यांनी त्यात आपलाही हायकूप्रतिभा प्राण ओतावा व वैज्ञानिक दृष्टीकोनातून काव्यप्रतिभा निखरावी हाच त्यांचा उददेश. यावर आपण खरे उतरण्याच्या प्रयत्नांचं मनापासून अभिनंदन..!
तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
कवयित्री/ लेखिका/ परीक्षक/संकलक