अनोखा प्रवास..माझा व सखा साहित्यगंधचा
आज आपला ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचा ५० वा ‘साहित्यगंध’प्रकाशित होत आहे. आपल्या साहित्यगंधाचा सुवर्ण महोत्सव दिन. किती पटकन गेले ना हे एक वर्ष. १७ जून २०२१ मध्ये मी या समूहात आले. आणि ८ जुलै २१ रोजी आदरणीय राहुलसर व सविताताईंनी ‘साप्ताहीक साहित्यगंध’ हा नवा उपक्रम सुरु केला. आज मला जून मध्ये, तर आपल्या साहित्यगंधास जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण झाले. आम्ही दोघेही समुहात सोबतच आल्याने साहित्यगंध मला खूपच जवळचा ‘सखाच’ वाटतो. कितीही व्यस्त असले तरी रात्री उशिरा का होईना पण साहित्यगंध वाचल्या शिवाय चैन पडत नाही. साहित्यगंधातून प्रकाशित झालेल्या लेखांतून खूप काही शिकायला मिळतं. काव्यरचना वाचून माझ्या शब्दसंचितात वाढ होते.
अजूनही पहिला साहित्यगंध प्रकाशित होतानाचा दिवस आठवतो आणि मला माझच हसू येतं. झालं असं, आदरणीय राहुल सरांनी पोस्ट टाकली की, ‘साहित्यगंध’ या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे आज संध्या.६ वाजता ” बहर मराठी प्रतिभेचा” या समूहात ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय सौ.वृंदाताई करमरकर यांच्या शुभहस्ते ऑनलाईन प्रकाशन होणार आहे. तरी इच्छुकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे. झालं मी त्या दिवशी लवकरच सगळी काम आवरुन बेडरुम मधे बसले. घरात सांगूनच ठेवल की, आज आमचा ऑनलाईन साहित्यगंध प्रकाशन सोहळा आहे. तर मी व्यस्त असेन मला कोणी त्रास देऊ नका. मला वाटल झुम वर प्रकाशन होणार असेल. लिंक आली की आपण जॉइन होऊ. त्यावेळेस मी हायकू समूह, चित्र चारोळी समूह २, कविता समूह ३ व ४ या समूहात होते. मी एकसारखी चारी समूह पहात होते. पण मला झुमची काही लिंक दिसली नाही.
पण आता घरात सांगणार कसं ना की मला बघताच नाही आला प्रकाशन सोहळा. सगळेच हसले असते. रचना म्हणाली “काय ग ममा एवढ्या लवकर संपला कार्यक्रम?” मी म्हटल “अग नाही! रेंजच नाही आहे”.ती हुशार. ती समजली काय ते. दुसऱ्या अंकाच्या वेळेसही तेच..तिसऱ्या अंकाच्या प्रकाशनाच्या वेळी मात्र मी थोड्या द्विधा मनःस्थितीतच कविता समुह २ जॉइन केला. अरे! पण हे काय? माझी झुम वर प्रकाशन सोहळ्याची कल्पना पार मोडून पडली होती. आणि समूहात न भूतो न भविष्यती असा अनोखा साहित्यगंध प्रकाशन सोहळा नियोजन पध्दतीने सुरु होता. आदरणीय वैशालीताईंनी लगेचच समूहात माझे स्वागत केले. अद्वितीय अशा सोहळ्याची अनुभूती त्यावेळी पहवयास मिळाली. एकिकडे साहित्यगंध बहरत होता तर एकिकडे मी ही समुहात रुळत होते व आदरणीय सविताताई, स्वाती ताई, वैशालीताई, सुधाताई यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत होते आणि आज ही शिकतेय.
म्हणतात ना ऋणानुबंध असल्याशिवाय कोणीही कोणाच्या आयुष्यात येत नाही. माझेही आपणां सर्वांशी काहीतरी ऋणानुबंध नक्कीच असतील, म्हणूनच तर मी या ‘मराठीचे शिलेदार’ परिवाराशी जोडले गेले. या परिवाराने मला हरवलेली अर्चना परत मिळवून दिली. मला खूप समजून घेतले. कधी चुका समजावून दिल्या, तर कधी कौतुकाची थाप ही दिली. खरोखर मी आदरणीय राहुलसर,पल्लवीताई आणि माझ्या सर्व प्रशासक व परिक्षक ताई दादांची शतश: ऋणी आहे. आज या साहित्यगंधाच्या सुवर्ण महोत्सव दिनी साहित्यगंध साठी अथक परिश्रम घेणारे आदरणीय राहुलसर, आदरणीय पल्लवीताई ,आदरणीय सविताताई यांना माझे वंदन व अभिनंदनीय शुभेच्छा तसेच सर्व मान्यवरांचे ह्दयस्थ आभार व मन:पूर्वक अभिनंदन. सर्व साहित्यप्रभूंना अभिनंदनीय शु़भेच्छा.
अर्चना सरोदे ‘निखारा’कार
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव