माझे विद्यार्थी_माझे दैवत
प्राचीन काळापासून ‘गुरु’ श्रेष्ठ व्यक्ती मानला जातो. त्याच्या सारखा आदरणीय जगी कोणी नाही आणि म्हणूनच एकलव्यला गुरुदक्षिणा द्यावी लागली होती. तेव्हाचा काळ हा आश्रम पद्धतीचा होता .परंतु हळूहळू काळ बदलत गेला. गुरूंची संख्या वाढत गेली. पद प्रतिष्ठा सांभाळता आपले व्यक्तिमत्व खुलवण्याची वेळ गुरुवर आली. आता तो शिक्षक बनला होता. त्याचे कर्तव्य म्हणजे एक आदर्श काम समजले जाते. दरवर्षी पाच सप्टेंबरला आदर्श शिक्षक तत्त्वज्ञानी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.मोठमोठे वक्ते बोलून जातात‘.गुरुविण नाही दुजा आधार’.पण मी म्हणते,‘माझे विद्यार्थी माझे दैवत’ आहेत. त्यांच्यापुढे आम्ही वयाने,अनुभवाने मोठे असलो तरी त्यांच्यामुळे आम्ही शिकतो.
आम्हाला नवनवीन ज्ञान प्राप्त होते. शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. पण जर विद्यार्थीच आपल्यासमोर नसतील तर आपले ज्ञानदान किंवा बोधामृत कुणाला देणार. आपले विद्यार्थी आपले दैवत कसे? तर त्यांच्या कुतूहल, जिज्ञासूवृत्तीमुळे आपण आपल्या प्रश्नांना समोर जातो आणि त्यातूनच बदलत्या काळानुरूप आपणही आपले ज्ञान अद्ययावत ठेवत असतो. अध्ययन अध्यापन ही अशीच प्रक्रिया आहे ज्यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण निरंतर चालत असते.
माझ्या वर्गात मी एकदा कलाकुसरीच्या काही वस्तू मोबाईलवर दाखवल्या. त्यात विविध प्रकारच्या चपलांचे जोड बनवलेले होते. दुसऱ्या दिवशी एका मुलीने चपलेचा जोड बनवला. तो इतका आकर्षक होता, की हळूहळू दोन-तीन दिवसात वर्गातील सर्व मुलामुलींनी विविध प्रकारची कलाकृती बनवली.मला कळून चुकलं की ही मुले आवडीने काही करू शकतात.त्यांना अभ्यासक्रमात जोडून घ्यायचे असेल तर हा उत्तम मार्ग मला गवसला. हळूहळू मोबाईलचा वापर वर्गात वाढला. स्वाध्याय, प्रश्नावली, कोडी, कविता गायन इत्यादी उपक्रम मोबाईल वर दाखवून त्यांना अभ्यासाकडे वळते केले. वाचन लेखनात कमी असणारी मुले ही आता पुढे सरकू लागले. मिळेल त्या विषयावर दहा ओळी संवाद लिहिणे. गोष्ट तयार करण्यासाठी वर्गातील,परिसरातील वस्तूंचा वापर केला. पत्र लेखन करताना विषयानुसार पत्र कसं लिहायचं ही तर आता सांगण्याची वेळच ऊरली नाही.
एक दिवस रुचिका मला बोलली,‘मॅम,तुम्ही या शाळेत आधी का नाही आलात?’ त्यावर मला कळून चुकलं की आपला जो अध्यापनाच्या मार्ग आहे तो योग्य पद्धतीने चालू आहे. ज्ञानहंडी उपक्रमातून दिलेल्या, मिळालेल्या कोणत्याही विषयावर मुले बोलती झाली होती. माझा सातवा वर्ग असल्याने बाला सभेला वर्गात राबवलेल्या सर्व उपक्रमांची जोड लहान वर्गापर्यंत पोचती झाली. नकळत सारी शाळाच उपक्रमशील बनली. दर शुक्रवारी बाल सभेला नवनवीन उपक्रम स्वतः तयार करू लागली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. शाळेतील इतर सहकारी शिक्षक खुशीत होते. दर जयंती पुण्यतिथी ला शाळेत कार्यक्रम व्हायचे. काही दिवस संचालन मी स्वतः केले.मग स्वतःहूनच मी मी करत माईक हातात घेण्याची स्पर्धाच जणू लागली होती. माझे कामच हलके झाले होते. इयत्ता दुसरीतील राधिका सुद्धा दिव्यांग असून ऐकून ऐकून संचालन करायला लागली होती.
मुले दुसऱ्या शाळेत गेले तरी रस्त्याने जाताना बाय बाय मॅडम जेव्हा म्हणतात तेव्हा एक आदर वाटतो.आपले कार्य व्यवस्थित सुरू आहे याची जणू पावती मिळत होती. शाळेतील मुलांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली. ‘कोरोना’अचानक आलेला पाहुणा ज्याने सारे काही संपविण्याचा ध्यासच घेतला होता जणू.गेल्या दोन वर्षात अभ्यास विसरलेली मुले आता शाळा सुरू कधी होणार असे फोन करून वारंवार विचारणा करू लागले आणि शाळा सुरू होण्याची वाट बघत होते. कंटाळलेली पालक सुद्धा मुले शाळेत गेलेलीच बरी असे बोलू लागली होती.त्यातच पाच सप्टेंबरला मुलांनी शिक्षकांसाठी ‘धन्यवाद शिक्षक’ अशा प्रकारचे पत्र लेखन करून घ्यायचे होते. अगदी शेवटचा दिवस होता आणि मी सहजच माझ्या वर्गातील मुलांना मेसेज टाकून बघितला तर त्यांनी जे काय पत्र लेखन केले आहे ते वाचून तर असं वाटतंय की नाही शिक्षका पेक्षा दुसरं कार्य कधीच मोलाचे होऊ शकत नाही आणि आपले मुलं आपले दैवत असतात.
शाळा हे एक मंदिर आहे तर माझे विद्यार्थी माझे दैवत आहेत. मला अजूनही आठवतो माझा सुरू नोकरीचा काळातील वर्ग दुसरीतील विद्यार्थी. माझी बदली झाल्यावर मला पत्र लिहिले होते.ज्यात अनमोल वाक्य होतं. मॅम,मला इथे मार्गदर्शन मिळते. पण तुमच्यासारखे नाही.ते पत्र मी फार जपून ठेवले आहे. त्या पत्रातील मजकुराचे मला शिक्षक म्हणून जिवंत ठेवलेले आहे.आजही दर गुरुौर्णिमेला न चुकता त्या मुलाचे मेसेज येतात. कुठेतरी धन्य झाल्यासारखे वाटते मी माझ्या गुरूंना विसरले नाही तसे आपले मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्याना विसरू देत नाही.गुरू शिष्यचे नाते असेच अतूट, विश्वसनीय असते. २३ ऑक्टो.ला माझा वाढदिवस होता.वर्गातील सर्व मुलांनी मिळून केक आणला व माझा वाढदिवस आनंदाने साजरा केला.किती प्रेम म्हणावं.माझा मोबाईल हातात घेऊन न लाजता फोटोज् काढल्या.झेपेल तसे छोटे गिफ्ट आणले. ग्रीटिंगकार्ड सुद्धा बनविले.माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं.छोट्याश्या खेड्यातील ही मुले .किती निर्मळ मन आहे. नकळत साने गुरुजींच्या कवितेतील ओळी आठवल्या.
प्रभूची लेकरे सारी,
तयाला सर्वही प्यारी,
कुणा ना तुच्छ लेखावे,
जगाला प्रेम अर्पावे.
वनिता महादेव लिचडे
ता.पवनी, जि.भंडारा