
चला पाऊस बँकेत जमा करूया!!
पल्लवी पाटील, नागपूर
यंदाचा पाऊस राज्यासह भारतात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात सारखाच पडल्याचे चित्र आहे. जो पडणारा पाऊस आहे त्याची साठवणूक योग्य पद्धतीने केली; तर आपल्याला तीन वर्षे पाऊस पडला नाही; तरी आपण पुरू शकतो. परंतु नियोजनाच्या अभावामुळे बेसुमार जंगलतोड ,पर्यावरणाचा आपण केलेला रास व जमिनीत पाणी मुरू नये अशी आपण केलेली रचना यामुळे आपल्या काही विशिष्ट भागामध्ये मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे सत्य नाकारता येत नाही.
यावर उपाय म्हणजे सध्या कोसळणारा पाऊस आपण धरती मातेच्या उदरामध्ये जमा करणे गरजेचे आहे . त्यासाठी इमारतीच्या टेरेसवरून वाहणारे पाणी किंवा टेरेसवर घातलेल्या छपरा वरील पाणी घरातील पावळ्यांचे (पागोळ्याचे) पडणारे पाणी आपण पनळी द्वारे एकत्र गोळा करून ते एका ड्रमा मध्ये किंवा पिंपात गाळून जमा करा. तत्पूर्वी पिंपाला खाली ( आउटलेट) मोठा पाईप लावून आपल्या बोरवेल ला जोडा किंवा विहिरीमध्ये सोडा मात्र विहीर कठड्याची असली पाहिजे. आपोआप सर्व पाणी त्यामध्ये गोळा होईल आणि विहिरीत असलेल्या झ-यामुळे ते पाणी भूमीमध्ये भूमीच्या आत असलेले झऱ्याचे अंतर्गत जाळ्यावरून पाणी बँकेत जमा होईल. वसुंधरा बँकेत जमा झालेले हे पाणी तुम्हाला किमान दीड वर्ष वापरता येते मग तुम्हाला पाणी किती स्वच्छ जमा करता येईल याचा विचार करा आणि मग तुम्हाला पटेल की मी का म्हणाले त्याला “पाणी बँकेत जमा करूया”.
राहता राहिला प्रश्न कित्येक बोअरवेलला तिनशे फूट करून सुद्धा पाणी लागत नाही. मग अशा बंद पडलेल्या बोरवेल वरती दगड माती टाकून बुजवण्याचे पण काही प्रकार करून ती आपण नष्ट करून टाकतो. परंतु अशा बोरला सुद्धा पावसाळ्यामध्ये कपडा बांधून स्वच्छ पाणी गाळून भरण्याची व्यवस्था करा आणि त्याचा परिणाम बघा खरोखरच तुमची बोअर मारण्यासाठी खर्च केलेला पैसा तुम्हाला फुकट गेला. जर असे वाटत असेल तर तो चुकीचा समज आहे. त्याही बोरिंगला तुम्हाला वर्षाचे बारा महिने पूर्ण पाणी आता मिळू शकते.
तातडीने निसर्गाने दिलेल्या पाण्याचा अनमोल ठेवा त्या बंद पडलेल्या बोरवेल मध्ये सोडा आणि चमत्कार पहा. मी एका सामाजिक पर्यावरणवादी संस्थेवरती काम करत आहे काही सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रयोग केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत ज्या बोरिंग ला मार्च महिन्यात पाणी आटते ते पाणी आता आटत नाही बारा महिने पाणी पुरते. जेथे दीडशे फुटावरती पाणी होतं ते पाणी वर्षभर 25 फुटापर्यंत पाणी कायम राहतं. प्रयोग करायला काहीच हरकत नाही. तर ‘चला पाऊस बँकेत जमा करूया’.
पल्लवी पाटील, नागपूर