महाराष्ट्रात सर्वांना उद्या ११ वाजता राष्ट्रगीत म्हणावे लागेल
_राज्य सरकारचे जनतेला आदेश_
नागपूर: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले आहे. देशभरातील राष्ट्रगीत (जन, गण, मन) चे सामूहिक गायन सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११:०१ वाजता संपेल, असे सरकारने म्हटले आहे. उद्या ११ वाजता नागरिकांनी जिथे आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीत म्हणायचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सरकारने गेल्या आठवड्यात काढलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारच्या सर्व विभाग, विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सर्वांनी यात सहभागी होणे बंधनकारक आहे, तर सर्व नागरिकांनीही या गायनात सहभागी होणे अपेक्षित आहे.
हा केंद्र सरकारच्या ‘स्वराज महोत्सवा’चा भाग असल्याचे आदेशात म्हटले आहे. खासगी आस्थापने, व्यापारी आणि इतर सरकारी विभाग, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सरकारी विभागांनीही यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे, असे आदेशात म्हटले आहे. राष्ट्रगीत गाण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोकळ्या मैदानात एकत्र येणे अपेक्षित आहे.