जलतत्त्वातूनच बाप्पाची निर्मिती; प्रा तारका रूखमोडे
_हायकू काव्य परिक्षण_
🙏गजानना श्री गणराया..आधी वंदू तुज मोरया’.. कुठलंही शुभकार्य करताना ज्याच्या केवळ नामस्मरणाने इच्छित कार्यपूर्ती होते.. अशा शुभ व परमार्थाच्या लाडक्या दैवताचं भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणरायाच्या सगुण रूपाची घराघरात स्थापना होते..मखर,फुलांची आरास,नैवेद्य,भक्तिभाव, आस्था पूजा यात 11 दिवस त्याच्या सात्विक चैतन्यात घर नि मन पवित्र्याने ओसंडून वाहते.. त्याच्या कार्य ऊर्जेत दिवस कसे निघून जातात काही कळतही नाही.. पण येतो मग तो क्षण..
निरोप क्षण
जड अंतःकरण
भावूक मन
होय ..बाप्पाच्या निरोपाचा क्षण.. निरोपाला मनात नि डोळ्यात अवघं आभाळ दाटतं,अंतःकरण जड होतं.. ज्याच्या सान्निध्यात अनंत उर्जा व सुख लाभलं त्या सुखासिनतेला निरोप द्यायला मन धजत नाही.. पण जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे हे सत्य स्वीकारून.. पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करत ज्या माती नि जलतत्त्वातून त्याची निर्मिती झाली त्या जलतत्त्वात त्याला विलीन केलं जातं.. जाताना भक्तजनांचा उर भरून येतो.. बाप्पाचेही पापणकाठ या निर्मळ भक्तीसाठी जणू ओलावतात.. सुखाने सर्वांना भरभरून आशीर्वाद देत बाप्पा आयुष्याचा सुखसार सांगून निरोप घेतात.. जलप्रवाहात मूर्तीचे चैतन्य पाण्याद्वारे दूरवर पोहोचते..आसमंती सात्विक ऊर्जा वातावरणात पसरते..भक्ताचं दाटलेलं आभाळ रितं होऊ लागतं..
हळवे क्षण
अनंत चतुर्दशी
दाटले मन
✍️अशी ही अनंत चतुर्दशी ..विचारांचे अनंत कंगोरे श्रींच्या प्रयोजन प्रेरणेभोवती फिरवत नेणारी.. ‘अनंत’.. एक रेशमी धागा बाप्पाला निरोप देताना मनगटावर त्याच्या सात्विक आशीर्वादासाठी बांधलेला.. हा धागा जणू जीवनाचे सार सांगतो.. जसे दहा दिवस एकोप्याने वागलात तशे आयुष्यभर सुखाने माणुसकीचं लेणं लेवून एकतेची गुंफण करा.. प्रसाद वाटून खाल्लीत तसंच आयुष्यात भुकेल्यास भोजन घाला.. पंचामृताप्रमाणे तहानलेल्यास जलामृत पाजा.. दुःखहर्ता होऊन दुरितांना सुख वाटून सुखकर्ता व्हा.. काल्याच्या भावभक्तीत रमलात तसा जीवनानंद घ्या.. जसं मी विसर्जित होतोय तसं कालांतराने मानवी रूपदेहही विसर्जित होणार ..म्हणूनच प्राप्त आनंदानंतर पुन्हा जीवनात अगदी स्थितप्रज्ञ व्हा ..जीवन मृत्यूतील हे अंतर सुखाने जगा जगू द्या.. अनंत चतुर्दशीचं प्रयोजन हीच एक मोठी प्रेरणा- मोजता येणार नाही एवढी अनंत ऊर्जा, सुख आठवणी सोडून जाणारी.. अशी ही अनंत चतुर्दशी
याच चतर्दशीला त्या ऊर्जा चैतन्यरूपी सगुणाचे.. निर्गुण निराकाराकडे चाललेल्या प्रवासाचे हळवे क्षण रेखाटण्यासाठी आदरणीय राहुल सरांनी हे चित्र दिलेलं.. त्यात सर्वांची लेखणी भावभक्तीत हळवेपणाने भिजली.. चैतन्य ऊर्जेत सुवर्णमय झळाळीने आज हायकूत प्रवाही झाली.. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. असेच आशीर्वाद बाप्पाचे प्रत्येकांच्या लेखणीस लाभोत या शुभेच्छेसह.💐👍. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..🙏
सौ. तारका रूखमोडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया
कवयित्री/ संकलक/ परीक्षक
©️ मराठीचे शिलेदार समूह