जीवनगाणे…सुख-दुःखाचे सोडवी उखाणे…!
_सौ वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर_
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परिक्षण
सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!
पायात काटे रुतून बसतात,
हे अगदी खरं असतं,
..आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं, की फुलांसारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा !
सांगा कसं जगायचं ?
कवीवर्य मंगेश पाडगावकरांची ही रचना जीवनाचा सार सांगून जाते. आयुष्य म्हटलं,सकी सुख-दुःख ओळीने येणारच. सारे ऋतू सारखे नसतात…तसेच जीवनाचे…दुःखाची काहिली साहल्याशिवाय सुखाची सर कळत नाही आणि धो धो आसवांच्या धारांनी न्हाहताना….कधीतरी मायेच्या गोधडीतील ऊब सरत नाही…खरंय ना…? मग ह्याच सुखदुःखाच्या तारांना छेडून सुरेल गीत उमटवता आले तर…प्रीतमायेचे धागे गुंफता आले तर….तर जीवनगाणे बहरेलच ना…!
होय, जीवनगाणे….’आपली माणसं’ चित्रपटातील एक सुरेल गीत आपल्या कानावरून कधी ना कधी गेले असेलच…’ जीवनगाणे गातच राहावे… झाले गेले विसरून जावे… पुढे पुढे चालावे… जीवनगाणे…इथे जीवनच गाणे झालेयं…हे गाणं संपूच नये…गातच राहावे… आयुष्याच्या वाटेवर खाच खळगे…चढउतार येणारच… म्हणून जीवनगाणे थांबायला नको…बरे वाईट घडणारच त्याला विसरून पुढे चालत राहणे हेच खरे जीवन….किती समर्पक ना….!
‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार समूहाचे माननीय मुख्य प्रशासक राहुल पाटील यांनी ‘जीवनगाणे’ हा विषय दिला… आणि या जीवनगाण्याच्या सुरावटींवर मन ताल धरू लागले. खरंच आपलं जीवन म्हणजे एक गाणंच…पण ते प्रत्येक वेळी सुरेलच असेल असे नाही…या गाण्यामध्ये कधी तरल प्रीतभाव असतील; तर कधी भक्तीचा मळा…कधी रम्य फुलांचा ताटवा असेल तर कधी एकटेपणाची विराणी…पण गायला हवीच…कारण भावनांची सरमिसळ म्हणजेच जीवनगाणं.
मराठीचे शिलेदारांनी जीवनगाण्याचा सूरताल छान पकडला…हाच सूरताल साहित्यविश्वात कायम निनादत राहू द्या. मराठीचे शिलेदार समूह आपल्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करण्यास तत्पर आहे. चला तर आगामी ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२२’ च्या दिवाळी अंकात आपले स्थान निश्चित करू या. सर्वांच्या लेखणीस भरभरून शुभेच्छा..!!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक