कर्णकर्कश ध्वनीमुळे कानाच्या पडद्याला कायमचे अधुपण येण्याचा धोका; डाॅ. अविनाश वाचासुंदर
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे-( प्रतिनिधी) – य॔दा पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत कमालीची बेशिस्त आणि विस्कळीतपणा आढळून आला. गणेश मंडळांचे मिरवणुक रथ एकाच जागी रेंगाळून विसर्जनाला विलंब झाला. वाहतुककोंडी, तासन तास चाललेला जल्लोष, डी जे सिस्टीममुळे आवाजाची धोकादायक पातळी ओलांडली जाणे, या सर्व गोष्टींनी मिरवणुक मार्गावरील निवासी आणि आजुबाजूच्या अबालवृध्दांना अतिशय मनस्ताप सहन करावा लागला.
विशेषतः कानांवर आदळणारा आवाज इतका भयानक होता की, अनेकांना त्याचा गंभीर त्रास भोगावा लागला. याची तीव्र प्रतिक्रिया शहरभर उमटली. तरूण भारतने या विषयाचा पाठपुरावा करून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. याच अनुषंगाने धव्नीप्रदुषणाचे श्रवणेंद्रायांवर होणारे परीणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने पुण्यातील प्रसिध्द कान नाक घसा तज्ञ, डाॅ. अविनाश वाचासुंदर यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीतील ध्वनीप्रदुषणामुळे होणारे गंभीर धोके लक्षात आणून देताना डाॅक्टरांनी म्हणाले की, ” कोरोनाकाळातील निर्बधानंतर यंदाचा उत्सव साजरा करण्यात गणपती मंडळांचा उत्साह अमाप होता. त्या उत्साहाच्या भरात ध्वनी प्रदुषणाकडे दुर्लक्ष झाले हे नक्की. मी स्वतः हे अनुभवले, दुस-या दिवशी सकाळी फिरायला गेलो तेव्हाही विसर्जन मिरवणुक सुरूच होती. डाल्बीच्या भयंकर आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसत होत्या. खरे तर ढोलताशा पथकांची महिनाभर आधी तालीम सुरू होते तेंव्हापासूनच या ध्वनी प्रदुषणाला सुरूवात होते. पुढे दहा दिवस कर्णकर्कश्श्य स्वरात गाणी सुरू असतात.
विसर्जन मिरवणुकीत तर ही ध्वनीची पातळी धोक्याची रेषा ओलांडून पुढे गेली. यामुळे कानाचा पडदा फाटणे, पडद्याला छिद्र पडणे किंवा पडदा घासून कायमची दुखापत असा श्रवणेंद्रियाला अत्यंत गंभीर धोका यातून उत्पन्न होतो. त्यावर औषधोपचार किंवा ऑपरेशन याचेही उपाय करण्यापलीकडे हा दुखणे धोकादायक होते. तसेच,ध्वनींच्या तीव्र आघाताने चक्कर येणे, ब्लडप्रेशर वाढणे हे परीणाम शरीरावर त्वरीत
दिसून येतात. याशिवाय एकाग्रता भंग होणे,अस्वस्थता वाढणे, हृदयक्रिया मंदावणे, मानसिक स्थैर्य ढासळणे असेही संबंधित दुष्परीणाम घडून येतात. इतक्या समस्या निर्माण होऊन कुणाच्या कानाला जर कायम स्वरूपी आधुपण येणार असेल तर उत्सवातील या ध्वनीसंवर्धनावर गणेश मंडळांनी विचार करायला हवा. आनंद व जल्लोष साजरा करण्याच्या नादात जर समाजाला उपद्रव होणार असेल आणि आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होत असतील तर नगरपालिका, पोलीस यंत्रणा व सरकार यांनी याबाबत कडक नियमावली करावी. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, याची पहाणी करणासाठी तपासणी पथकं नेमली जावीत. या समस्येवर प्राधान्याने उपाय म्हणजे, ध्वनीनिर्मितीवर निर्ब॔ध आणणे, ध्वनीपातळी श्रवणक्षमतेईतकी राखणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे करावेच लागेल.
गणेशोत्सव ही पुण्याची सुंदर परंपरा आहे, तिला असे विकृत वळण लागणे कुणाच्याच हिताचे नाही; एक ENT स्पेशालिस्ट या नात्याने समाजाच्या श्रवण यंत्रणेची काळजी वाटते. लहान बालके, वृध्द नागरिक आणि आजारी व्यक्तींची जपणुक करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विशेषतः गणपती मंडळं आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांनी एकत्रितपणे व सांमजस्याने ध्वनीप्रदुषण थांवण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलायला हवीत.आजवर अनेक तज्ञांनी ध्वनीप्रदुषणावर भरपूर चर्चा केली आहे. त्यामुळे सर्वांना याचे दुष्परीणाम माहित आहेत, तरीही उत्सवाच्या निमित्ताने या गोष्टीकडे सर्वच घटकांचे सोयीस्कर दुर्लक्ष होते आहे. हे दुर्लक्ष मात्र खूप महाग पडेल. अनेकजणाच्या श्रवणेंद्रियांवर आघात करण्याचा हा खेळ दुर्दैवी आहे. वेळीच तो थांबवायला हवा.