नाशिक येथे भीषण अपघातात ११ठार तर ३८ जखमी
नाशिक : नाशिक ते औरंगाबाद मार्गावर एका खासगी बस आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागून त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. यानंतर ट्रॅव्हल्सच्या डिझेल टँकमध्ये आग लागली. पाहता पाहता अवघ्या बसने पेट घेतला. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. याबरोबरच मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील अशीही घोषणाही त्यांनी केली आहे.