अपघातातील मृतकांना राज्य व केन्द्र सरकारने प्रत्तेकी 25 लाख द्यावे
_कॉग्रेस नेते देवानंद पवार यांची मागणी_
यवतमाळ: जिल्हयातील चिंतामणी ट्रॅव्हल्स ला नाशिक जिल्हयात झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. या अपघाताला लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत मृतकांच्या कुटूंबाला राज्य तसेच केन्द्र सरकारने प्रत्तेकी 25 लाख रुपये देण्याची मागणी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे जाण्यासाठी यवतमाळला रेल्वेमार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागतो. अशातच प्रचंड स्पर्धा असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्या नियमांचे उल्लंघन करीत ट्रॅव्हल्स चालवित आहे. याआधी सुध्दा मुंबई मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. स्पर्धेत पैसे कमविण्याच्या नादात ट्रॅव्हल्स कंपन्या अप्रशिक्षीत चालकांना कामावर ठेवत असल्याचे सुध्दा अनेकदा समोर आले आहे. प्रशासनाचे सुध्दा दुर्लक्ष असल्याने प्रवाशांचा जीव सतत धोक्यात येत असतो. आज झालेल्या अपघातात सुध्दा नियमाच्या बाहेर प्रवाशांना ट्रॅव्हल्स मध्ये बसविण्यात आले होते. एवढेच नव्हे तर पॅसेंजर लिस्ट सुध्दा अपडेट नव्हती. ट्रॅव्हल्सच्या स्पर्धेत आपल्या जीवाला धोका असल्याचे माहित असतांना सुध्दा जनतेला प्रवास करावा लागत आहे. आज रेल्वे मार्ग उपलब्ध असता तर नागरीकांना जीव गमविण्याची पाळी आली नसती.
सन 2008 मध्ये भूमिपुजन झालेल्या वर्धा यवतमाळ नांदेड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी या फक्त रेल्वेच्या कामात फोटोसेशन करायला येतात. आता मृतकांची जबाबदारी घ्यायला सुध्दा त्यांनी पुढे यावे. जवळपास 14 वर्षापासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. तरीही खासदार मात्र लक्ष द्यायला तयार नाही. ईडी च्या नावाखाली बेपत्ता राहणे आणि विकासकामांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे आता नागरीकांच्या जीवावर बेतत असल्याची टिका सुध्दा देवानंद पवार यांनी केली आहे.
*रेल्वेसाठी संघर्ष करु*
रस्त्यावरील ट्राफीक प्रचंड वाढल्याने नागरीकांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ जिल्हयात तीन टर्म पूर्ण होत आहे. तरी देखील रेल्वेच्या कामाला गती आलेली नाही. त्यामुळेच आज झालेल्या अपघाताला लोकप्रतिनिधी यानात्याने खासदार भावना गवळी या जबाबदार आहे. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्ग लवकर पुर्ण व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु.
देवानंद पवार
प्रदेश सरचिटणीस, कॉग्रेस