
होय…स्वप्नेच विकतो आम्ही…!; वैशाली अंड्रस्कर
_शनिवारीय काव्यस्तंभ परीक्षण_
किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती….
पानोपानी फुले बहरती…..
फुलपाखरे वर भिरभिरती…..
स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई…
होय….एक मी गाव पाहिला बाई….खरंय ना…स्वप्नांचा गाव… बालपणापासूनच आपल्याला ओढ असते स्वप्नांची…स्वप्नातील राजकुमार, राजकुमारी तर कधी घेण्या क्षितिजापार भरारी…मन वेडे स्वप्न बघते नयनांतरी…!
पण प्रत्येकच स्वप्ने कधी खरी होतात काय…कधीच नाही… शालेय जीवनात वाटतं मंचावर जाऊन कधी मोठमोठी भाषणं ठोकावीत…तिथे आत्मविश्वासाची कमतरता. लिहिलेल्या चार ओळी कुणाला दाखवून कौतुक करुन घ्यावे तिथे रसिकांची निरसता…मग गुपचूप आपल्याच रोजनिशीत काहीतरी खरडत जायचं आणि आपलं आपणच झुरत जायचं…पण पण..अहो थांबा… कशाला झुरायचं आम्ही असताना…मराठीचे शिलेदार समूह आपल्या पाठीशी असताना…?
रोज नव्या विषयावर नव्या ऊर्जेने लिहिणारे आमचे कवी, कवयित्री, चारोळीकार, हायकूकार यांच्या प्रत्येक शब्दांचा सन्मान करणे हे आमचे ध्येय… मराठी भाषा सक्षमीकरणासोबतच मानवी मनातील भावनांचे उत्फुल्ल प्रकटीकरण करण्याची नामी संधी म्हणजे मराठीचे शिलेदार समूह…या समूहात रोज शब्दांच्या फुलांनी स्वप्नांची बाग सजवायची आणि हरवून जायचं आनंदाच्या सुगंधात अगदी खोलवर श्वास घेऊन…!
पण थांबा जरा…हे सर्व साध्य करताना आर्थिक बाबींचाही प्रश्न असतोच. मात्र मायमराठीच्या प्रेमापोटी राहुलदादा नेहमी धडपडत असतात. सर्व बाजूंचा सारासार विचार करून… आपल्या सर्वांच्या आनंदासाठी झटत असतात. आपली अर्धवट राहिलेली लेखक, कवी अशी स्वप्ने आपण या व्यासपीठावर पूर्ण करतो. त्याकरीता नाममात्र शुल्काची शिलेदारांकडून अपेक्षा असते. मात्र कुणी याला नाकं मुरडतात म्हणतात पैसे घेऊन छापतात… देणगी घेऊन पुरस्कार देतात…आता मला सांगावे कुठलाही शासकीय अथवा खाजगी पुरस्कार आपण दोन रूपयांची झेरॉक्सही न काढता कधी मिळवला काय…?
कितीतरी कागदांची जुळवाजुळव करून सरकार दरबारी वाऱ्या करून जेव्हा कधी एखादा पुरस्कार मिळतो…त्या अनुषंगाने मिळणारी एखादी आगाऊ वेतनवाढ सहजासहजी मिळते काय…? कोर्टकचेऱ्यांच्या भानगडी करून हातपाय थकतात तेव्हा कधीतरी हाताशी ती वेतनवाढ पडते. अगदी जवळच्या अनुभवातून आलेली ही उदाहरणे आहेत.
या शिलेदार समूहाच्या माध्यमातून नसेल मिळत तुम्हाला एखादी वेतनवाढ पण अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील सुद्धा मराठी वा अमराठी माणसांशी जुळलेले ऋणानुबंध ही या समूहाचीच देण आहे. आपल्या मनात जपलेल्या स्वप्नांना साकार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी थोडी पदरमोड केली तर कुणाची हरकत नसावी…कारण भौतिक सुखाच्याही पलीकडे जाऊन भावनांना साद घालणारी स्वप्ने विकतो आम्ही…कारण आपल्या स्वप्नांचे मोल जाणतो आम्ही…!
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय मुख्य प्रशासक राहुलदादा पाटील यांनी ‘स्वप्न विकतो आम्ही’ हा विषय दिला. सर्वांनीच स्वप्नांचे सुंदर इमले बांधलेत. कडूगोड अनुभवांना आपल्या लेखणीतून मुक्त केले. सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा… पुन्हा भेटू पुढील परीक्षक लेखणीसह तोवर नमस्कार…!
ता. क. – मला याठिकाणी भारतीय चित्रपटसृष्टीचे शोमॅन यांच्या ‘धरम करम’ चित्रपटातील या ओळी मनास फार भावतात…
इक दिन बिक जायेगा माटी के मोल
जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल……
दुजे के होठो को देकर अपने गीत….
कोई निशाणी छोड फिर दुनिया से डोल
आपल्या राहुलदादांचं कार्य याहून काही वेगळं आहे का..? शिलेदारांच्या ओठांवर गाणं यावं…लेखणीतून शब्द बरसावेत हीच त्यांची धडपड…या धडपडीला शतशः प्रणाम…! 🙏
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह