अनियंत्रित वर्चस्वाला लगाम….भारतीय संविधान…!; वैशाली अंड्रस्कर
कधी आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची माळ बघितली ? तळ्यात विहरणाऱ्या बदकांचा थवा किंवा रानात बागडणाऱ्या हरणांचा कळप बघितला ? अगदी एकतेने, कुणावरही कुरघोडी न करता जीवन जगण्याचा मंत्रच जणू हे पशुपक्षी देत असतात.
मात्र मानवी समुदाय जसजसा प्रगत होत गेला त्याच्यातील माणुसकी जणू लोप पावत गेली. अर्थ, सत्ता, जमीनजुमला यांच्या आधारे कमकुवत समाजघटक आणि नैसर्गिकरीत्या शरीराने जरा कोमल पण मनाने जरी कणखर असलेल्या स्त्री वर्गावर धर्माच्या नावाखाली वर्चस्व गाजवण्याची अहमिका मूठभर लोकांमध्ये लागली. त्यातच भारतीय साम्राज्यात परकीय सत्तेचा वावर. अशा दुहेरी संकटात समाज असताना १५ ऑगस्ट १९४७ ला देश गुलामगिरीतून मुक्त झाला. पण पूर्वापार चालत आलेल्या गुलामीचे काय ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘भारतीय संविधान’ तुमचे माझे साऱ्यांचे ‘भारतीय संविधान’. अनियंत्रित वर्चस्वाला लगाम घालणारे ‘भारतीय संविधान’.
भारतीय संविधान देशातील सर्व नागरिकांना काही मूलभूत हक्क घटनेच्या भाग ३ नुसार प्रदान करते. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजननेचा हक्क अशी कलम १४ ते ३२ पर्यंत हक्कांची मांडणी संविधानात केलेली आहे. यातील कलम ३२ हे तर भारतीय संविधानाचा आत्माच आहे असे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेले आहे, कारण या कलमानुसार इतर मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा कोणीही अन्यायाविरुद्ध ३२ व्या कलमानुसार न्यायालयात दाद मागू शकतो.
खरेतर ‘भारतीय संविधान’ हे मोजक्या शब्दांत मांडण्याचे दस्तऐवज नव्हे. २ वर्षे ११ महिने १८ दिवस अहोरात्र मनन चिंतन आणि लेखन करून मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अंतीम मसुदा संविधान सभेपुढे मांडला आणि तो औपचारिकरित्या स्वीकारला गेला. हाच तो दिवस जो ‘संविधान दिन’ म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
काल संविधान दिनानिमित्त आपल्या मराठीचे शिलेदार समूहात ‘संविधान एक हक्क’ हा विषय माननीय राहुल पाटील यांनी अगदी समयसूचकतेने दिला. मराठीचे शिलेदारांनी अभ्यासू वृत्तीने अगदी सखोल संविधानातील हक्क, कर्तव्ये आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीच्या कार्याला आपल्या रचनांमधून यथोचित न्याय दिला. सर्व सहभागी शिलेदारांचे अभिनंदन…संविधानात अनुस्यूत आपल्या हक्कांना आणि कर्तव्यांना कायम अंगी बाणवून भारत देशाला उच्चस्थानी न्यावे हीच शुभकामना…!
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह