का आहेत अजित पवार नाराज? निवडणुकीबाबत काय म्हणाले?
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे.” असं म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आज पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.
निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले, “आम्ही सरकार असताना इतर मागास समाजाला आरक्षणासाठी आम्ही खटाटोप केला. आमची अपेक्षा होती की, ताबडतोब निवडणुका लागाव्यात आणि सर्वांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. परंतु नंतरच्या काळात राजकीय स्थित्यंतर अशी घडली की, सततच या निवडणुका पुढे पुढे चालल्या आहेत.” “सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्याही आणि जे निवडून यायचे ते आलेही. असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का लागत नाहीत? एखादा विषय न्यायव्यवस्थेच्या समोर असेल तर त्याचा अंतिम निर्णय न्यायव्यवस्थाच घेते. मात्र, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाचे लोक असोत, सर्वांनी एक निर्णय घेतला पाहिजे. फेब्रुवारी २२ ला महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका व्हायला हव्या होत्या. आता डिसेंबरमध्ये १० महिने होतील, तरी निवडणुका होत नाहीत,” अशी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केली.