“गांधी हत्येचे धागेदोरे कॉंग्रेसपर्यंत”; रणजित सावरकर
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी जो आरोप केला होता, त्यानुसार सावरकरांनी नथुराम गोडसेंना पिस्तुल दिल्याचे म्हटले होते. त्यावर रणजित सावरकर म्हणाले की, हा बिनबुडाचा आरोप आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी जगदीश गोयल यांनी सांगितले होते की, हे पिस्तुल त्याला नाथिलाल जैन नावाच्या व्यक्तीने दिले होते आणि ते इटालियन सेनेचे होते. नाथिलाल जैनला पोलिसांनी अटक केली होती. पण या जैनला न्यायालयासमोर आणले नाही कारण तो काँग्रेसच्या मंत्र्याचा मेहुणा होता. हे ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे याची तार काँग्रेसशी जुळते.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या क्रांतिकारकांवरून, देशभक्तांवरून वाद निर्माण केले जात आहेत, त्यांना या वादात ओढले जात आहे. त्यावर रणजित सावरकर म्हणाले की, यातच त्याचे उत्तर सामावले आहे. ज्यांनी योगदान दिले त्यांना श्रेय तुम्ही देऊ इच्छित नाही. ज्यांनी कष्ट घेतले, बलिदान दिले त्यांची दखल घेतली जात नाही. जर तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत नसाल तरी हरकत नाही. पण त्यांच्यावर चिखलफेक का केली जाते? गेल्या २० वर्षांपासून असे होत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले तेव्हापासून हे सुरू आहे. २०१०मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार होते तेव्हा हे बंद झाले होते पण मोदी सरकार आल्यानंतर पुन्हा याला सुरुवात झाली. स्पष्टच आहे की, सावरकरांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यावर आपल्याला मतांचे ध्रुवीकरण करता येईल, हा होरा आहे.
२०००मध्ये असा आरोप केला गेला की, कपूर आयोगाने गांधी हत्येत सावरकरांना दोषी मानले होते. तर तो आरोप खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, सावरकरांना कपूर आयोगाने दोषी मानलेले नाही. कपूर आयोगाचा अहवाल वाचला की स्पष्ट होईल. महात्मा गांधी यांचा जीव वाचविण्यात काँग्रेस कशी अपयशी ठरली याची उलट या अहवालात माहिती आहे.