व्यापले भुलथापांनी जीवन…. फक्त आश्वासनांनी होण्या पावन…!; वैशाली अंड्रस्कर
*शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुलदादा पाटील यांनी ‘त्या भूलथापा’ विषय दिला आणि बऱ्याचदा ऐकलेलं गानसम्राज्ञी आशा भोसले यांचा स्वर असलेलं ‘थापाड्या’ चित्रपटातील….*
*आला आला आला आला आला*
*मेंढराच्या कळपात लांडगा शिरला*
*त्याला मी हेरला, त्याला मी हेरला*
*सोंग घेऊन सोंगाड्या आला…*
*लई घोटाळा त्यानं बाई केला*
*थाप मारून थापाड्या गेला गं*
*थाप मारून थापाड्या गेला गं….*
*हे सदाबहार गाणं मनात रूंजी घालू लागलं…लडिवाळ प्रीतीचे रूप साकारताना एकमेकांची शब्दांच्या माध्यमातून घेतलेली ही फिरकी गीतकार स्व. बाळ पळसुले यांनी अचूक शब्दबध्द केली आणि म्हणूनच आजवर ती रसिक मनांवर राज्य करते.*
*आता हा थापाड्या काय आणि आपला त्या भूलथापा देणारा किंवा देणारी काय…भन्नाट जुगलबंदी शिलेदारांची…. प्रत्येकाच्या लेखणीचा बाज वेगळा…कुणी हळवा होतोयं, कुणी मजबुरी समजून सहजपणे थाप स्वीकारतोयं…कुणी सामाजिक असमतोलाचं भान महाल आणि खोप्यातून अधोरेखित करतं तर कुणी कृतघ्न अपत्ये जन्मदात्या आईवडिलांनाच कशा भूलथापा देतात याचाही समाचार घेतं. वैविध्यपूर्ण आशयाचं मंथनच जणू सर्वांच्या रचनांमधून. खास म्हणजे कविता समूह ७ मधील पक्के थापाडे डॉ. संजयदादा पाचभाई आणि सौ. वसुधाताई नाईक यांच्या रचनेने तर पोट धरून हसवायला लावले.*
*पण आता जरा वास्तवाकडे येऊ…. सद्यपरिस्थितीत राजकारण आणि समाजकारण कशा भूलथापांवर चालतं याचंही भान काही कवींनी जपलयं. निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच नेतेमंडळींच्या भुलथापांची खैरात कशी बरसते आणि ‘गरज सरो वैद्य मरो’ या उक्तीप्रमाणे नेते मंडळी कसे सरड्याप्रमाणे रंग बदलतात…याची चुणूकही शिलेदारांच्या रचनांमधून दिसली. बरेचदा काही व्यंगचित्रांमधून ‘आपण निवडून येणार नाहीच मग करा आश्वासनांची खैरात’ किंवा ‘सगळीच आश्वासने पाळायची नसतात म्हणून करा भुलथापांची खैरात’ अशा कोडगेपणाला आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे कवीवर्यही अभिमानास्पद….!*
*लेखाच्या अखेरीस एक गोड कोळीगीत मला आठवलं…*
*गोमू संगतीने माझ्या तू येशील का…?*
*गं तुला रूप्याची नथनी घालीन*
*गं तुला मिरवत मिरवत नेईन….*
*तुज्या फसव्या या जाल्याला अशी मी गावनार नाय…!* 😂😂😂
*भूलथापा मारणारा कोळी आणि त्याला चतुराईने हुलकावणी देणारी कोळीण शेवटच्या क्षणाला ‘आरं संगतीनं तुज्या मी येणार हाय’ म्हणते आणि रसिकजनही सुटकेचा निःश्वास सोडतात….हीच ताकद शब्दांची…. नितांतसुंदर तितकंच सामाजिक भान जपणारे विषय देणारे राहुलदादा खरोखरचं अद्भुत रसायन….या प्रयोगशाळेत आपल्या शब्दरूपी प्रयोगांचे स्वागतच… फक्त सूचनांकडे लक्ष द्या. आम्ही प्रमाणपत्रासाठी फोटो मागवितो ते तुम्हाला आनंद देण्यासाठीच….एक आदर्श वाचक म्हणून आपण ओळखले जावे म्हणून निकाल वाचनाचा आग्रह धरतो….शब्दांनी फुलतात मळे, शब्दांचा सुगंध पसरू द्या…संवादाच्या सेतूला असेच बांधत राहा…सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔖🌸🔖♾️♾️♾️♾️