‘वज्रमुठीत कुठल्याही पोलादाला वाकवण्याची शक्ती असते’; प्रा.तारका रूखमोडे
_शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण_
कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तर कधी कामगारांच्या गूलबत्त्या, कधी विद्यार्थी बेरोजगार, तर कधी स्त्रियांचे हालंहाल. म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभारला जातो एल्गार. भारत स्वतंत्र होऊन व लोकशाही येऊन बरीच वर्ष उलटलीत. पण तरीही स्वतःच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलने अद्यापही सुरूच. कारण आजही काही स्वार्थी घटक प्रादेशिकतेच्या नावाखाली देश तोडण्याच्या प्रयत्न करताहेत. काही गद्दार पंजाब, काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवून बंधुतेचे नुकसान करताहेत. तर काही सामाजिक क्षेत्रातील स्वार्थी उथळ प्रवाह शेतकरी व मजुरांना आत्महत्येच्या गर्तेत ढकलून देताहेत. समाजात फूट पाडून एकता मोडण्याचा प्रयत्न करताहेत.
एक पक्ष राष्ट्रीयत्वाच्या पुरस्कार करतो. तर दुसरा पक्ष धर्मवादाचा ढोल बडवतो. तथ्य दडवून तर्क वितर्क लढवतात. समाजातील तेढ वाढवून स्वार्थ साधून घेतात. आमच्यातील राष्ट्रीय वृत्तीचा अभाव हे आमचे सर्वात मोठे वैगुण्य आहे आम्ही फक्त स्वतःचा विचार करतो. सारासार विचार करण्याची आमची कुवत केव्हाच संपुष्टात आली आहे. आमच्या देशातील काही युवक मंडळी परकीय शक्तीच्या हातातील बाहुली बनली आहेत याचा फायदा घेऊन भारताचा होणारा विकास आणि प्रगती सहन न होणारी काही घटक व राष्ट्रे भारतातील शांतता धोक्यात आणत आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी खंबीर चारित्र्यसंपन्न व प्रभावी नेतृत्वाची आपल्या भारताला नितांत गरज आहे..
एकीचे बळ
असे मुळी अभेद्य
मिळते फळ
म्हणूनच आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने राहणे फायद्याचे ठरते. कुठलेही कार्य जे एकट्याने होत नाही; ते कार्य संघटनेने किंवा एकीने पार पडते. म्हणून संघटित होणे महत्त्वाचे ठरते. विविधता संघटित होऊन चालते तेव्हाच सफलता मिळते. जे कार्य एक बोट करू शकत नाही, ते कार्य पाचही बोटं मिळून करू शकतात. वज्रमुठीत कुठल्याही पोलादाला वाकवण्याची शक्ती असते,तसेच एकीचे बळ लढण्याची शक्ती देते फूट पडू देत नाही व विजयश्री कडे घेऊन जाते. भूतकाळातील काही वास्तविक घटनांनी हे सिद्ध केलं आहे. म. गांधी, लोकमान्य टिळक यासारख्या अनेक देशभक्तांनी एकतेची वज्रमूठ स्वीकारली व आंदोलने यशस्वी केली.
महामानव डॉ. बाबासाहेबांनी अनेक राष्ट्रीय एकता संघ उभारून मनामनात एकतेची ज्योत पेटवली व उर्मटाला एकीच्या बळाने वाकवता येते हे अनेक देशभक्तांनी सिद्ध करून दाखवले. शिवाजी महाराज यांनीही कुशल मावळ्यांच्या एकजूटतेच्या संघटनेनेचं स्वराज्य मिळवले. खरंच एकतेत कुठल्याही मोठ्या संकटाला भेदण्याची शक्ती आहे. चला तर प्रत्येकाने अन्यायाला स्वतःच्या वज्रमुठीने प्रहार करून सामाजिक राजकीय क्षेत्रातील गगनभेदी स्वप्न सत्यात उतरवूया. हेच मर्म आजच्या चित्र काव्यातून रेखाटण्यासाठी आ.राहुल सरांनी दिलेलं. सर्व प्रतिभावंत साहित्यिक यावर आज खरे उतरलेत. आपणा सर्वांचे अभिनंदन..💐💐
ज्याप्रमाणे अंधारातून उजेड, अशुभातून शुभ व निराशेतून दैवी आशा फुटते. तद्वतच आपल्या या सज्ञान लेखणीने सशक्त बनून, अन्यायाला भेदणारी काव्य निर्मिती करा. आदर्श वाचक बना व लिहिते व्हा. विजेत्या साहित्यिकांनी सन्मानपत्रासाठी आवर्जून फोटो पाठवत चला. आ.राहुल सर आपण मला हायकू परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल आपले हृदयस्त ॠणाभार 🙏🙏
प्रा. तारका रूखमोडे
अर्जुनी मोर,जि गोंदिया
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/कवयित्री/संकलक