‘श्रद्धा विश्वासाची मूर्तता, गावकुसाबाहेरची ग्रामदेवता’; वैशाली अंड्रस्कर
_शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण_
“सत्वर पाव गे मला | भवानी आई रोडगा वाहिन तुला ||”
संत एकनाथांच्या भारूडातील ही ओळ आणि त्यातील ‘भवानी’ हा शब्द ऐकताना नकळतपणे दगडांच्या, लाकडाच्या किंवा धातूच्या हळदीकुंकू लावलेल्या, शेंदूराने माखलेल्या मूर्ती नजरेसमोरून तरळून गेल्या. आई भवानीसोबतच माराई, मरिमाय, सटवाई, आसरा, म्हसोबा, घाटोबा, वाघोबा आणि यांसारखी अनेक ग्रामदेवता-दैवतांची नावेसुद्धा सहज आठवून गेली. ही सर्व दैवते गावकुसाबाहेर एखाद्या घनदाट झाडाखाली, एखाद्या पाणवठ्याच्या जवळ नित्यनेमाने आढळून येतात. काय प्रयोजन असावे या ग्रामदेवतांचे किंवा ग्रामदैवतांचे….?
फार पूर्वी माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता. जंगलातील प्राण्यांची शिकार करून मांस खाणे, फळे, कंदमुळे खाणे यावरच त्याचा उदरनिर्वाह चालत होता. कालांतराने तो शेती करू लागला. एका जागी वस्ती करून राहू लागला. हळूहळू वाड्या वस्त्यांची निर्मिती झाली. तरीपण त्याचा निसर्गाशी बंध सुटलेला नव्हता. अचानक येणाऱ्या आपत्ती, जंगली श्वापदांचे भय, जीवनाची अनिश्चितता, पंचमहाभूतांतील अनपेक्षित बदल या सर्वांपासून संरक्षण मिळावे अशी एक मानसिक शक्ती किंवा आधार त्याला हवा होता. तो त्याने या ग्रामदेवतांच्या रूपाने मिळवला.
या ग्रामदेवतांना तो आपल्या इच्छा आकांक्षा सांगू लागला. त्या पूर्ण झाल्या की आपल्या कुवतीप्रमाणे त्यांना काही वस्तू, अन्न अर्पण करू लागला. कधी कोंबडं बकरं बळी देऊ लागला. वाड्यांवरील सर्व लहानमोठे त्यात आनंद शोधू लागले. हळूहळू या छोट्याशा उपक्रमाला जत्रेचे स्वरूप आले. मौजमजा, आनंदाचे साधन लोकांना गवसले. ग्रामदेवतेच्या श्रद्वेवर, विश्वासावर लोक निर्धास्तपणे जीवन जगू लागले. त्यात मग कालौघात बदल झाले. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा आली. कुणीतरी मध्येच जगन्नियंत्याचा मध्यस्थ बनून भोळ्याभाबड्या जनतेला श्रद्धेच्या नावाखाली लुबाडू लागले. आजकाल तर राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी प्रत्येक सण-उत्सवाचे इव्हेंट होऊ लागले. त्यातून सर्वसामान्य जनतेच्या मनातील ग्रामदेवता वा ग्रामदैवतांच्या प्रती जी आरंभीची सश्रद्ध भावना होती त्यात चढाओढ आली. निकोप सामाजिक नात्यांना स्वार्थाच्या बाजारात वाळवी लागली.
तरीसुद्धा आजही ग्रामीण भागात अथवा नागरी जीवनातही लग्न समारंभ, सणवार, कुळाचार यात ग्रामदेवता आणि ग्रामदैवत आपले स्थान टिकवून आहे. याचे महत्त्व जाणूनच मराठीचे शिलेदारांनी शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने दिलेल्या ‘ग्रामदेवता’ या विषयाला योग्य न्याय दिला. ग्रामदेवतेच्या उत्पत्ती पासून मध्ययुगीन, अर्वाचीन संतांनी दिलेल्या संदेशापर्यंत सुंदर विवेचन केलेले आहे. समूहाचे मुख्य प्रशासक माननीय राहुलदादा पाटील यांनी दिलेले विषय खरोखरच मननीय चिंतनीय असतात. समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे असतात. त्यासाठी मान्यवरांचे कौतुक करावे तितके कमीच…!
सहभागी सर्व स्पर्धक आणि विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी साहित्य प्रवासास भरभरून शुभेच्छा…!
✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह