“खुर्चीच्या चर्चेचे गुऱ्हाळ; आणि आघाडीत बिघाडी”; स्वाती मराडे
_गुरूवारीय चित्रचारोळी स्पर्धेचे परीक्षण_
“पाच वर्ष झाली की, पुन्हा चर्चा खुर्चीची रंगते,
अमुक येणार की तमुक, जनता उगाच भांडते..”
बघता बघता पाच वर्ष संपतात. संसदेचा कार्यकाल संपतो नि जाहीर होते आचारसंहिता. निवडणुकीचे वारे वाहू लागतात. राजकीय गप्पांना ऊत येतो. अमुक पक्ष कसा चांगला.. तमुक नेता कसा वाईट.. यावर चर्चेचे गुऱ्हाळ चांगलेच रंगते. कधी कधी चर्चेचा सूर हमरी तुमरीवर येतो नि नेते राहतात बाजूला; पण भावकीतच भांडण जुंपते. चर्चा खुर्चीची अशी सामान्य लोकांमध्ये तंटा लावून जाते.
कुणाची युती तुटते तर, कुणाच्या आघाडीत बिघाडी होते. तर कुठे स्वार्थी मनोमिलन होते. निवडणुका आल्या की येतो पक्षांतराचा वारा, मीच कसा लढू शकतो देतात लढाऊपणाचा नारा. जिकडे तिकडे बंडोबांची चलती असते तर निष्ठावान कार्यकर्त्यांची होऊन कुचंबना बंद केलेली बोलती असते. सोयिस्करपणे आघाडीचा धर्म पाळला जातो. तर कधी तो खुर्चीसाठी टाळलाही जातो. कुठे कुठे एकाच घरातील उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध ठाकतात, जनतेच्या मनात उगाचच संभ्रम जागवतात..सत्तेसाठीच्या आकडा गाठायला गणिताची जुळवाजुळवी होते तर कधीकधी उमेदवारांचीही पळवापळवी होते. कळत नाही कधी आपणास राजकारण्यांची ही चाल, हे तर आहे सर्वसामान्यांना न समजणारे मायाजाल.! त्यामुळेच चर्चा खुर्चीची करताना सारासार विचार करावा.. एकमेकांविषयी मनी ना कटू भाव धरावा. म्हणूनच चर्चा खुर्चीची करताना स्थिर ठेवावे चित्त, बावळेपणाने वागून उसळू न द्यावे पित्त.
खरेतर खुर्ची चार पायाची. मग ती सत्तेची का असेना. राजकारण, समाजकारण, निष्ठा व सचोटी हे तिचे चार पाय असावेत पण एकेक पाय गळून गेला नि व्हील चेअर प्रमाणे राजकारण हा एकच पाय उरला. जो त्या खुर्चीला वाटेल तसा वळवतोय हेच खरे. आदरणीय राहुलदादांनी चित्रचारोळी स्पर्धेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेले चित्र मनात असेच विचारतरंग निर्माण करणारे. आजच्या राजकीय मानसिकतेचा विचार केल्यास सेवाभाव व समाजकारण कमी आणि खुर्चीसाठी कुरघोडीचे राजकारण, डाव प्रतिडाव जास्त बघायला मिळताहेत.
साम, दाम, दंड, भेद कोणतीही निती वापरून सत्तेचा जादूई आकडा स्वतःच्या पारड्यात झुकवण्याची जीवघेणी चढाओढ लोकशाहीचाच गळा घोटते की काय असेच वाटू लागले आहे. याकरता आज मतदारांनीच निवडणुका हातात घेणे अपरिहार्य झाले आहे.. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व अबाधित ठेवू शकेल असा सर्वमान्य नेता सत्तेच्या खुर्चीत बसवावा आणि लोकशाहीचा विजय करावा.. तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल. आजच्या या विषयावर विविधांगी रचनांचा वर्षाव झाला.. अनेक कंगोरे समर्थपणे टिपताना मार्मिक टिका टिप्पणीही झाली.. सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा.. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल दादांचे हृदयस्थ आभार 🙏
सौ स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री लेखिका
मराठीचे शिलेदार समूह