शासकच जमिनीचा मालक खरा…म्हणून भरावा लागतो शेतसारा….!; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्त़भ स्पर्धेचे परीक्षण
साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थात ८०-९० वर्षांपूर्वी “उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी” अशी व्यवसायाची उतरंड होती. जी आजच्या काळात जरा उलटप्रवाही झालेली आहे. मात्र शेती व्यवसायाची कितीही हेटाळणी केली आणि नोकरी-व्यापारातून पैसा कमविला तरी पोटाची भूक भागविण्यासाठी मातीतून पिकविलेल्या मोत्यांचीच गरज भासते हे निर्विवाद सत्य आहे, हे कोणी नाकारू शकत नाही.
अशा या शेती व्यवसायात अगदी प्राचीन काळापासून करप्रणाली अस्तित्वात होती. जसे, कौटिल्याच्या अर्थनीतीनुसार प्राचीन काळी हिंदू राजे १/६ शेतसारा वस्तू अथवा रोख रक्कमचे स्वरूपात घेत असत. पुढे कालानुरूप प्रत्येक राजवटीनुसार शेतसाऱ्याचे स्वरूप बदलत गेले. कुठे महालवारी, कायमधारा, रयतवारी अशा वेगवेगळ्या नावांनी हा शेतसारा वसूल केला जाई. त्यातही शिवरायांसारखे प्रजाहितदक्ष राजे शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रतवारी ठरवून शेतसारा गोळा करत, त्यामुळे प्रजासुद्धा तो शेतसारा आनंदाने भरत असे. ब्रिटिश काळात मात्र याला खिळ बसली आणि सर्वत्र अनागोंदी माजली. दुष्काळ, नापिकी याने त्रस्त असतानाही अव्वाच्या सव्वा शेतसारा वसूल करून शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ लागली.
आपल्या भारत देशात आजच्या घडीला महसूल विभाग ही जबाबदारी पार पाडतो. प्रत्येक राज्याला तेथील परिस्थितीनुरूप शेतसारा ठरविण्याचा अधिकार आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून देशविकासाची कामे आणि शेतकऱ्यांसाठी काही योजना राबविण्याची तरतूद केलेली असते. पीककर्ज, पीकविमा यांसारख्या योजना याचेच फलित आहे.
मात्र दिवसेंदिवस जमिनीचा खालावलेला पोत, कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ यात पिचलेला शेतकरी सावकारीच्या दुष्टचक्रात अडकतो आणि गळफास लावतो तर कधी हुंडारुपी लालसेला पूर्ण करण्यासाठी लेकीच्या लग्नात शेतजमीन विकून उघड्यावर येतो. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबायला हवे. शासक जरी शेतसारा घेणारा जमिनीचा मालक असला तरी प्रत्यक्ष मातीत राबणारा शेतकरी जेव्हा पोटभर अन्न, घोटभर पाणी आणि सुखाची निद्रा घेईल तोच खरा सुदिन म्हणायचा…आज चारोळी आणि कविता अशा दहाही समूहात फेरफटका मारला पण म्हणावा तसा प्रतिसाद ‘शेतसारा’ विषयाला मिळालेला दिसला नाही.
तरीपण नीलाताई पाटणकर, शिकागो यांच्या, ‘शेतसाऱ्याला पैका नाय, कर्जाला पर्याय नाय…’ या ओळी मनाला स्पर्शून गेल्या. विष्णूदादा संकपाळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या कवितेने शेतसाऱ्याची ओळख करून दिली. विकास गोपाळ खराते, किल्लारी, लातूर यांनी शेतसारा भरणाऱ्या शेतकऱ्याचा प्रामाणिकपणा विशद केला, तर प्रतिभा गौपाले, नागपूर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे ह्रदयस्पर्शी दुष्टचक्र रेखाटले…. सर्वांच्याच लेखणीचे खूप खूप अभिनंदन….कल्पनेसोबतच वास्तवतेला स्पर्श करणाऱ्या विषयांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा…!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह