स्वातंत्र्य, समता व बंधुता कशासाठी हवी?
भारतीय न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्ववेत्ता, समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ अशा कितीतरी उपाधींनी गौरविलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताचे शिल्पकार होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या देशात मूठभर लोक श्रीमंत होते. तर बहुसंख्य लोक दारिद्र्यात पिचलेले होते. हा विरोधाभास जोवर दूर होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती केवळ अशक्य होती आणि यासाठी सर्व देशवासियांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज होती. अशा वेळेस त्यांना जातीपातीमध्ये खेळून ठेवणे एका अर्थाने लोकांवर अन्याय करण्यासारखेच होते. त्यांच्या समता विचारात खऱ्या अर्थाने लोकशाही मूल्यांचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांच्या मते लोकशाही म्हणजे जनतेच्या सामाजिक व आर्थिक जीवनात मूलभूत बदल घडवून आणणारी यंत्रणा होय. तेव्हा मानव म्हणून सर्वांना समान वागणूक देत नाही, तोवर मानवता प्रस्थापित करणे शक्य नाही व तोवर माणसाच्या कोणत्याही अंगाने विकास अपेक्षित नाही.
तत्कालीन भारतीय समाजात विषमतेचं बी इतकं खोलवर रुजलेलं होतं की, एकाच रंगाचे रक्त असलेले लोक जात, पात, धर्म, पंथ यात विखुरलेले होते. बाबासाहेबांसाठी हे अतिशय वेदनादायी होते. सामाजिक लोकशाहीच्या जीवन मार्गातून स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचा अंगीकार प्रत्येकाने करावा, तरच समाज परिवर्तन होईल यावर ते ठाम होते. आम्ही सर्व एकाच भारत मातेचे लेकरं आहोत, तेव्हा भेदाभेदाला थारा न देता प्रत्येकाचा मूलभूत विकास व्हावा हा त्यांचा नेहमीच आग्रह होता.
त्याकाळी असलेल्या कर्मठ विचाराच्या लोकांनी अस्पृश्यता जोपासलेली होती. त्यामुळे लोकांना जन्माने ते मानव पण कर्माने पशुतुल्य जीवन जगावे लागत होते. अशा लोकांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कासाठी बाबासाहेबांनी निकराचा लढा दिला व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी देखील झाले. अस्पृश्यतेचा दाह त्यांनी स्वतःच अनुभवलेला होता. त्याकाळी नैतिकतेचे निकष जातीपातीवरून ठरत होते. हे सर्व बदलायचे असेल तर, समाजामधील जाती जातींमध्ये असलेल्या भिंती नष्ट व्हाव्यात यासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रयत्न केले. ‘अत्त दीप भव’ म्हणजे स्वतःच, स्वतःचा मार्गदर्शक हो…!! यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच तर केवळ दलित, शोषितच नव्हे तर अखिल मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचा देह झिजवला अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम…..!!
सविता पाटील ठाकरे,सिलवासा
कार्यकारी संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’