चर्चेतून सोक्षमोक्ष लावता येईल काय?; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘सोक्षमोक्ष’ शब्द अनेकदा व्यवहारात वापरला जातो. सध्या माणूस पैशामागे लागलेला यंत्र झाला आहे. त्याच्याकडे आपल्या माणसांसाठी वेळ नाही. जो वेळ आहे त्या वेळात तो आभासी दुनियेत रमतो. आधीच एकत्र कटुंब पध्दती विस्कळीत झाली आहे. त्यात आपापसातील संवाद हरपत चालले आहेत. दोन कुटुंबात काही कारणाने आलेले वितुष्ट विकोपाला जाते. पण योग्यवेळी चर्चा करून सामोपचाराने हे वाद मिटवून त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे.
वैवाहिक जीवनात सुध्दा पती पत्नींमध्ये मतभेद होतात. प्रत्येकाचा अहंकार, माघार कोण घेणार असा प्रश्न असतो. घटस्फोट हा मार्ग काही अपरिहार्य परिस्थितीत ठीक आहे. पण जर चर्चेने, सामंजस्याने प्रश्न सुटणार असतील तर या प्रश्र्नांचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. त्यासाठी समुपदेशकाची मदत होऊ शकते. राजकीय क्षेत्रात तर परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्यात अनेक राजकीय नेते आपले कौशल्य पणाला लावतात. सत्तेवर,खुर्चीवर डोळा ठेवून राजकीय क्षेत्रात उतरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. लोकहिताचा दृष्टिकोन तर दिसतच नाही. तर स्वहितच जपले जाते. सामान्य जनतेवर अन्याय होतो. आश्वासनांची पानं त्यांच्या तोंडाला पुसली जातात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारांनी एकदा सोक्षमोक्ष लावून योग्य उमेद वार निवडून आणला पाहिजे. कोणत्याही आमिषाला न बळी पडता राष्टहिताची बूज राखण्या साठी योग्य तऱ्हेने मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडला पाहिजे.
*योग्य उमेदवार निवडावा*
*सोक्षमोक्ष एकदाच लावावा*
*मतदान ही अपूर्व संधी*
मतदार जर डोळसपणे वागले तरच राजकीय क्षेत्रातील वातावरण निर्मळ होईल. याचप्रमाणे बालमजुरी, बालमृत्यू, बाललैंगिक शोषण, स्त्रियांवरील अत्याचार आदि प्रश्न तडीला नेण्याची ,त्यांचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज आहे. योग्यतऱ्हेने चर्चा करून सोक्षमोक्ष लावल्याने प्रश्न सुटतील. आजच्या सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेला आदरणीय राहुल सरांनी दिलेला विषय ‘सोक्षमोक्ष’ विचार करायला लावणारा आहे. शिलेदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह