राग
‘नाकावरच्या रागाला औषध काय? गालावरच्या फुग्यांच म्हणणं तरी काय?’ असे एका मराठी चित्रपटातील गाणे आहे अशोक सराफ यांचे. छोट्याशा मुलीचा नाकावर आलेला हा राग, अशोक सराफ यांना तो घालवता घालवता नाकी नऊ आलं आहे. असे दृश्य त्या चित्रपटात दाखवले होते. तर राग माणसाला का येतो? मनाप्रमाणे झाले नाही तर, एखाद्याने आपले ऐकले नाही तर, आपली शिस्त कोणी मोडली तर, घरातल्या रोजच्या जागेवरच्या वस्तू इकडे तिकडे पडल्या तर, आपल्यापेक्षा हुशार कोणाला नको असते ते सहन होत नाही त्याचाही राग येतो. माणूस मोठ्या पदावर आहे आणि त्याच्या खालच्या लेव्हलचा माणूस खूपच हुशार आहे तरी देखील त्या मोठ्या पदाच्या माणसाला त्याचा राग, राग असतो. अशी रागाची विविध कारण आहेत.
अगदी तान्हे मूल सुद्धा रडते. त्याच्याकडे जरा जरी दुर्लक्ष झाले की, त्याला कळते. बाळ मग काय रडायला लागते. सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशा रागाच्या विविध व्याख्या आहेत. पण खरंच हा राग जर का विकोपाला गेला तर, त्याला वादविवाद,भांडण, मारामारी असे स्वरूप येते. अगदी काही वेळेला मनुष्यहानी सुद्धा होते. मग काय करावं बरं. राग यायलाच नको का? राग यायला हवा, पण तो राग गिळता पण आला पाहिजे. म्हणजे काय हो!
राग गिळता येणं म्हणजे रागावर नियंत्रण ठेवायला आलं पाहिजे. आपला राग आपल्याला शांत करता आला पाहिजे. जर समोरची व्यक्ती वाद घालत असेल तर आपण आपण शांत बसले पाहिजे. मग समोरचा व्यक्ती आपोआप शांत होतो. जर आपण वादाला वाद घालत बसले तर, वाद विकोपाला जातात. उगाच शब्दांची खेचाखेच होते. प्रसंगी हातही उगारला जातो. मन कलुशीत होतात. कलुशीत झालेली मन परत जुळायला प्रचंड वेळ लागतो. म्हणून रागावर नियंत्रण आपल्याला ठेवता आलेच पाहिजे.
एक गोष्ट सांगते…! भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसहित झाडाखाली बसलेले असतात. समोरून एक माणूस येतो. तो प्रचंड गोंधळलेला असतो. सो गौतम बुद्धांना अपशब्दांची लाखोली वाहतो. गौतम बुद्ध शांत मुद्रेमध्ये बसलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरची रेघही हालत नाही. सर्व शिष्य त्यांच्याकडे पाहतात, त्या माणसाकडे पाहतात, तो माणूस आपला बुद्धांना अगदी शिव्यांची लाखोली वाहत असताना दमतो. शांत होतो. खाली बसतो.
आता गौतम बुद्ध उभे राहतात. ते म्हणतात झालं तुझ्या शिव्या देऊन मला. आता त्या शिव्या मला नको आहेत त्या तूच घे आणि इथून निघून जा. इतका शांत स्वरामध्ये ते बोलतात, त्यांच्या सर्व शिष्यांना खूप आश्चर्य वाटते. गौतम बुद्ध शिष्यांना म्हणतात, जे मला नको आहे ते मी का घेऊ, मला नको मी नाही घेतली त्याचे त्याला मी परत दिले. अशी शांत मुद्रा असे विचार आपले आपण करावेत. म्हणजे समोरचा माणूस कितीही रागवला तरी आपल्यावर कोणताही परिणाम आपण करून घ्यायचा नाही. आपला चांगुलपणा आपण जपायचा. समोरचा चिडला त्याला राग आला पण आपण आपल्याला राग येऊ द्यायचा नाही. हे साधे तत्व आपण सांभाळले तर, आपले जीवन आनंदाने फुलून जाईल. जीवनात हेवेदावे उरणार नाहीत.
चला तर मग म्हणतात ना राग आला की मनात एक ते दहा अंक मोजावेत. एक ते दहा अंक मोजेपर्यंत आपला राग निवळतो. मन शांत होते. बघा तर मग हा एक प्रयोग करून.
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी पसरावा
जीवनाचा हा हर्ष मेवा
रागात न संपवावा..
वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जि.पुणे
(लेखिका प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका आहेत)
===========