एक डाव जीवनाचा..!!
दोन घडीचा डाव ! याला जीवन ऐसे नाव !! असे जीवनाविषयी म्हणतात. पण, वास्तविक पाहता सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, की दोन घडीचा जीवनाचा डाव आपण तेवढ्यात समर्पण भावनेने, उदात्त विचाराने आणि सकारात्मकतेने खेळतो का? ‘जीवन जगणे ही पण एक कला आहे’. ज्याला ती अवगत झाली तो जीवनात यशस्वी झाला. यशाची शिखरे पादाक्रांत करत गेला. जीवन म्हटलं की ,कधी ऊन कधी सावली, कधी सुखाची पहाट तर कधी दुःखाची लाट.
प्रत्येक जण आपापल्या परीने जीवनक्रमण त्याच्या स्वतःच्या ठरवलेल्या तत्त्वानुसार करत असतो. त्यात काही मनाने खंबीर असणारी असतात, तर काही मनाने हळवी असतात. पण जीवनाचा लढा यशस्वी करायचा असेल; तर खंबीर मनाचीच गरज आहे. जीवनातल्या यशाचा सोहळा साजरा करता आला पाहिजे. तर अपयश सुद्धा तितक्याच ताकदीने पचवता आलं पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उत्तर शोधता आले पाहिजे. कारण जिथे समस्या आहे तिथे उत्तर आहे. पण शोधक वृत्ती अंगी असायला हवी. हळव्या मनाची माणसे छोट्याशा अपयशाने खचतात, निराशावादी होतात आणि जीवनाच्या रणांगणात असमर्थ ठरतात. अन् या नैराश्याच्या भोव-यात अडकून जीवनाचा शेवट करतात. पण अशी हार न मानता जगावे. कवी गुरु ठाकूर यांच्या कवितेच्या ओळीस स्मराव्यात.
“असे जगावे दुनियेमध्येआव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर”
जीवनात आलेली निराशेची मरगळ झटकून द्यावी. नवचैतन्याने सुविचाराने सुरुवात करावी. जिथे संपलं असं वाटतं तिथं तर खरी सुरुवात असते. प्रसिद्ध गीतकार पियुष मिश्रा यांनी संगीतबद्ध केलेल्या, गायलेल्या सन २००९ मधील ‘गुलाल’ फिल्म मधील गीताच्या ओळी फारच प्रेरणादायी आहे. सुरुवात कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गीत.
आरंभ हे प्रचंड
बोले मस्तकोंके झुंड
आज जंग की घडी तुम गुहार दो
आन-बान शान या की जान का हो दान
आज एक धनुष्य के बाण पे उतार दो…………किती छान हे गीत मनाला उभारी देणारं. आरंभ हे प्रचंड याची महती सांगणारं. सुरुवात कशी करावी हे सांगणारं. प्रयत्न, चिकाटी, सातत्य यांची सांगड हवी तरच यश संपादित करू शकता. त्यासाठी सुरुवातच शक्तिशाली करायची आहे. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या प्रेरणादायी ओळी लक्षात ठेवा,” लहरो से डरकर नौका पार नही होती,कोशिश करने वालो की कभी हार नही होती, जब तक ना सफल हो, निंद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर, मत भागो तुम, कुछ किए बिना जयजयकार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती” आणि शेवटी एकच लक्षात ठेवायचं
Self confidence is a super power once you start to believe in yourself, Magic starts happening..
स्नेहल काळे
फलटण, जि सातारा
(लेखिका प्रसिद्ध कवयित्री व शिक्षिका आहेत)