जल हेच जीवन…!!
जलम् जल स्थानगतिम्
सर्वथा एव रक्षणीयम् ।
जन्तूनां सुख जीवनं हेतु
जलस्य रक्षणम् नूनं भवतु।
होय, पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचे रक्षण हिच काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र उन्हाचा कहर जाणवत आहे. मानवाच्या अवकृपेने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. याचा फटका बसतांना उन्हाळ्यात सर्वत्र पाण्यासाठी वणवण पहावयास मिळते. मागील आठवड्यात सिलवासावरून जव्हार कडून नाशिक जातांना काही आदिवासी बायका डोक्यावर हंडा घेऊन कडक उन्हात दोन तीन किलोमीटरची पायपीट करतांना दिसल्यात. सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पिण्याच्या पाण्यासारखा प्रश्न आजवर जर सुटत नसेल?जल हेच जीवन आहे, जलजीवन मिशन यासारखे अनेक कार्यक्रम शासनाकडून दरवर्षी राबवले जातात तरीही पाण्याची समस्या एप्रिल,मे महिन्यामध्ये उद्भवते याला केवळ शासन जबाबदार आहे असे मला वाटत नाही,तर आपण सुद्धा आपली भूमिका पार पाडली पाहिजे.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शक्य आहे तेवढे अडवून जर जमिनीत जिरवून ठेवलं तर उन्हाळ्यात निश्चितपणे त्याचा फायदा होईल ही साधी संकल्पनाही अजून माणसाच्या गळी उतरत नाही. उन्हाच्या तीव्रतेने जंगलातले पशुपक्ष्यांसाठी असलेले नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत या दिवसांनी आटून जातात तेव्हा माणुसकीच्या नात्याने जर आपण पक्षांसाठी बाल्कनीत किंवा घराच्या पुढे थोडे दाणे आणि पाणी ठेवले तर हे एक अतिशय चांगले कार्य ठरेल.
निसर्ग संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे.आधीच आपण पुष्कळ वृक्षतोड करून निसर्गाचा समतोल बिघडवलेला आहे. असेच होत राहिले तर भविष्यात उन्हाच्या तीव्रतेने माणसाचा अहंकार विरघळून पडेल यात शंका नाही. या दिवसांनी उष्माघातासारख्या अनेक घटनाही घडत आहेत.आपण एखादा पाण्याचा माठ जर भरून ठेवला तर वाटसरूंना निश्चितपणे याचा फायदा होईल व आपल्या या छोट्याशा कृत्याने कुणाची तहान भागत असेल तर त्याचं आत्मिक समाधान आपल्याला मिळू शकते. या गोष्टी जरी लहान असल्यात तरी अतिशय महत्त्वाच्या आहेत. चला संकल्प करूया मानवता जपण्याचा आपण खूप मोठा दानधर्म करू शकत नसलो तरी ही छोटीशी कृती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल व निसर्ग संवर्धनात आपला हातभार लागेल.
सविता पाटील ठाकरे, सिलवासा
दादरा नगर हवेली
कार्यकारी संपादक ‘साप्ताहिक साहित्यगंध’