‘राम रंगी रंगले श्रोते’; उलगडला रामायणाचा सत्य इतिहास
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे: भरत संशोधन मंदिर आयोजित ‘मन हे राम रंगी रंगले’ या संगीतमय कार्यक्रमात रामभक्तीपर गीतांचे गायन आणि वाल्मीकी रामायणातील ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारे निरूपण असा रसिकांना दुहेरी मेजवानी देणारा कार्यक्रम भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने नुकताच सादर करण्यात आला.या कार्यक्रमाची संकल्पना अभय जबडे यांची होती.
प्रज्ञा देशपांडे, प्रसन्न बाम, केतन अत्रे, अर्णव पुजारी,राजीव हसबनीस या गुणी गायकांनी पायो जी मैंने राम रतन धन , राम होऊनि राम गा रे, कबिराचे विणतो शेले,विश्वाचा विश्राम रे, श्रीरामचंद्र कृपाळू भज मन, काल मी रघुनंदन पाहिले, राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य अशा एकाहून एक सुमुधूर गाण्यांच्या स्वर वर्षावात अवघे सभागृह न्हाऊन निघाले. त्याच बरोबरीने प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक रवींद्र खरे यांनी वाल्मीकी ऋषी लिखित रामायण हे श्रीरामाचे चरित्र काल्पनिक काव्य नसून हजारो वर्षापूर्वी घडून गेलेला सत्य ईतिहास असल्याचे सोदाहरण उलगडून सांगितले.
जगातले सगळे समुद्रकिनारे व्यापाराच्या उद्देशाने आपल्या आधिपत्याखाली ठेवून महासत्ता बनू पाहाणारा लंकेचा बलाढ्य राक्षसराजा रावणाचा वध करण्याची योजना राणी कैकयीने आखली होती, त्यानुसार राम वनवास ई. गोष्टी घडल्या असे सांगून रवींद्र खरे यांनी, भरतभेट, लक्ष्मणरेषा, सीतेचे हरण, अवघ्या पाच दिवसात रामसेतू बांधणारे नल व नील हे स्थपती, हनुमानाचे लंकादहण, रावणवध तिथी, बिभीषणाचा राज्याभिषेक, अहिल्या उध्दार, ई.घटनांचे दाखले देऊन त्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट केली.श्रीलंकेसह इंडोनेशिआ, बाली, मलेशिया, पेरू, ईजिप्त, नेपाळ, अरबस्थान ईत्यादी देशात रामाच्या खूणा आढळतात, याबद्दलचे काही महत्त्वपूर्ण तपशील त्यांनी पुराव्यानिशी सांगितले.
कार्यक्रमात डाॅ. राम साठे, धनंजय शिरोळे, महेश श्रोस्त्रीय यांचा सत्कार करण्यात आला. गायक , वादक , निवेदक यांचा सत्कार पांडुरंग मुखडे व विनय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.”आम्ही नूमविय” चे सहकार्य या कार्यक्रमास लाभले.